वीज समस्येवर आमदारांचा तोडगा
बोईसर, ता. २० (वार्ताहर) : विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात विद्युत रोहित्रे खराब झाल्यामुळे नागरिकांना विजेच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांवर आमदार विलास तरे यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी बैठक घेतली.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितीचे (महावितरण) अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार तरे यांनी समस्यांचा आढावा घेतला. या वेळी मौजे कोकणेर, दुर्वेश, सातिवली, गांजे, केलीचा पाडा, जायशेत, पाचामुवा, हालोली भागातील खराब रोहित्रे तत्काळ दुरुस्त किंवा बदलण्याची मागणी करण्यात आली. तसेच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढती वीज मागणी आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटींवरही सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अजय दिवे, शहराध्यक्ष अतुल देसाई व झाकीर साठी आदी उपस्थित होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या अडचणींची दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांनी लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.