मोठी बातमी! 'ई-केवायसी' केली नाही, यापुढे 'लाडकी बहीण'चे पैसे बंद; १४ लाख महिलांची राहिली 'ई-केवायसी'; उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी, त्यांनाच लाभ, वाचा...
esakal April 22, 2026 11:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थींची निकषांनुसार पडताळणी झाली आहे. त्यात आता शेवटी लाभार्थींची ‘ई-केवायसी’ झाली. त्यातून प्रत्येक लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निकषांनुसार अडीच लाखांपेक्षा कमी आहे का, हे समजणार आहे. परंतु, तीन महिन्यांची मुदत देऊनही राज्यातील सुमारे १४ लाख लाडक्या बहिणींनी ‘ई-केवायसी’च केली नाही. त्यांना आता मुदत न दिल्याने त्यांचा लाभ आता आपोआप बंद होणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. १५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील अडीच लाखांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले. त्या प्रत्येकीला योजनेचा लाभही मिळाला. पण, मार्च २०२५ पासून निकषांनुसार पडताळणी सुरु झाली आणि चारचाकी वाहन असलेल्या, २१ वर्षांपेक्षा कमी वय व ६५ वर्षांवरील महिला, सरकारी नोकदार महिलांचा लाभ बंद झाला. याशिवाय केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्यांचाही लाभ बंद अथवा रक्कम कमी झाली.

निकषांनुसार एका कुटुंबातील एक अविवाहित मुलगी व एक विवाहित महिलाच योजनेसाठी पात्र आहे, तरीपण एका कुटुंबातच तीन-चार महिला लाभ घेत असल्याची माहिती पडताळणीत समोर आली. त्यांचाही लाभ बंद होणार आहे. तत्पूर्वी, अंगणवाडी सेविकांमार्फत त्याची पडताळणी देखील झाली. आता ‘ई-केवायसी’नंतर खूप मोठ्या संख्येने महिलांचा लाभ बंद होईल, असे महिला व बालकल्याण आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीची ‘ई-केवायसी’ केली जात आहे. ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती, तरीपण महिलांनी ती प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांना आता मुदत मिळाली नसल्याने त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. आता ज्यांची ई-केवायसी चुकली, त्यांना दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंतच मुदत आहे.

- जामसिंग गिरासे, उपायुक्त, महिला विकास, पुणे

लाडक्या बहिणींची स्थिती

  • सुरवातीच्या लाभार्थी

  • २.५७ कोटी

  • पडताळणीत अपात्र

  • अंदाजे ७१ लाख

  • उत्पन्नात अपात्र

  • ३५ टक्के

  • ‘ई-केवायसी’ न केलेल्या

  • १४ लाख

अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न आवश्यक

लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. परंतु, अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनी देखील लाभ घेतला आहे. आता ‘ई-केवायसी’च्या प्रक्रियेतून असे लाभार्थी समजणार आहेत. त्यांचा लाभ कायमचा बंद होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.