आंदोलनांना हवा नियमांचा लगाम
वरळीतील घटनेनंतर वाहतूकतज्ज्ञांचे मत; आपत्कालीन सेवांवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ भाजपने जांबोरी मैदान ते वरळी डोमपर्यंत काढलेल्या मोर्चामुळे वरळी भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. कोंडीत अडकलेल्या एका महिलेने गाडीतून उतरून थेट भाजप नेते गिरीश महाजन यांना जाब विचारला आणि वाहतूक कोंडीबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. आंदोलनामुळे रस्ते वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून, आंदोलनाला नियमांचा लगाम हवा, असे मत वाहतूकतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
रस्ता हा मार्गिका आणि पदपथ यांचा मिळून बनतो. शहरी भागात चार मार्गिका असल्यास एका तासात सरासरी ३,२०० वाहने ये-जा करतात. आंदोलनावेळी दोनपैकी एक मार्गिका वाहतुकीला खुली असावी. वाहतुक ठप्प झाल्याने शहराच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो. त्यामुळे यासाठी नियमावलीची गरज आहे.
- डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ
रस्ते हे आंदोलनाचे नव्हे तर प्रवासाचे माध्यम आहेत. ते अडवल्यास आपत्कालीन सेवा, कामकाज आणि कुटुंबीय जबाबदाऱ्या ठप्प होतात. अशा मोर्चांसाठी आझाद मैदानसारखी निश्चित ठिकाणे वापरणे, पूर्वनियोजन, पर्यायी मार्ग आणि वेळेचे नियमन आवश्यक आहे.
- सुशील पठारे, वाहतूक अभ्यासक
मुंबईत रस्ते कमी असून, त्या तुलनेत वाहने जास्त आहेत. नागरिकांनी आपल्याला प्रश्नांसाठी रस्त्यावर येणे ठीक, पण राजकीय पक्षही रस्त्यावर येत आहेत ते चुकीचे आहे. वाहतूक पोलिसांनी परवानग्या देताना सर्वसामान्य नागरिकांचा विचार करायला हवा.
- ए. व्ही. शेनॉय, वाहतूक तज्ज्ञ
लोकशाहीत आपला प्रश्न मांडण्याचा अधिकार दिला आहे. आंदोलने शिस्तीने व्हायला हवीत. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, याची दखल घेतली पाहिजे. हे आंदोलने करणाऱ्यांवर काही बंधने किंवा नियम असावेत. त्याचे सर्वांनी पालन करावे.
- अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ