देशात फक्त कोलकाता पोलीसच पांढरी वर्दी का घालतात? तुम्हालाही माहीत नसेल खरं कारण
Tv9 Marathi April 27, 2026 11:45 PM

पोलीस म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवते ती म्हणजे त्यांच्या अंगावर असलेली खाकी वर्दी, मात्र तुम्हाला माहीत आहे का? कोलकाता हे एकमेव असं शहर आहे, तेथील पोलीस खाकी वर्दी न घालता पांढरा यूनिफॉर्म घालतात, यामागे नेमकं काय कारण असू शकतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? कोलकाता पोलिसांची वर्दी सुरुवातीपासूनच पांढऱ्या रंगाची आहे. विशेष म्हणजे भारतात पोलीस प्रणालीची सुरुवातच ही कोलकाता शहरापासून झाली. कोलकातामध्ये इंग्लंडच्या इस्ट इंडिया कंपनीने पोलीस प्रणालीची सुरुवात केली. कोलकातामध्ये इस्ट इंडिया कंपनीचे प्रमुख अधिकारी जॉब चार्नोक यांनी 1690 मध्ये हुगळी नदीच्या काठी असलेल्या सुतानुती गावात तळ ठोकला होता. त्यावेळी इस्ट इंडिया कंपनीकडून आसपासचे तीन गाव खरेदी करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना पोलिसांची गरज भासली, तेव्हापासूनच भारतात पोलीस प्रणालीला सुरुवात झाली.

सुरुवातीला इस्ट इंडिया कंपनीच्या काळात या पोलिसांची वर्दी पांढऱ्या रंगाची होती. नंतर हळुहळु संपूर्ण भारतामध्ये पोलीस व्यवस्था आली, पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये बदल झाला. पोलिसांनी खाकी वर्दी घालण्यास सुरुवात केली. मात्र कोलकाता पोलिसांनी आपली पांढरी वर्दी कायम ठेवली. पश्चिम बंगालच्या इतर सर्व भागामध्ये पोलीस खाकी वर्दीच वापरतात मात्र फक्त कोलकाता हे एकमेव शहर असं आहे, जिथे आजाही पोलीस पांढरा युनिफॉर्म घालतात.

त्यामागे अजून एक महत्त्वाचं कारण हे देखील सांगितलं जातं की, कोलकाता हे एक किनारपट्टीवर वसलेलं शहर आहे. त्यामुळे या शहरात वर्षभर प्रचंड उष्णता असते. हवामान दमट असून हवेत मोठ्या प्रमाणात आद्रता असते. पांढऱ्या रंगाचं वैशिष्ट म्हणजे तो सूर्य किरणांना परावर्तित करतो आणि उष्णतेपासून तुमचं संरक्षण करतो, त्यामुळेच कोलकातामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील तेथील पोलीस आजही पांढऱ्या रंगाचीच वर्दी घालतात. मात्र देशातील इतर भागांमध्ये पोलीस खाकी वर्दी घालतात. अगदी पश्चिम बंगालच्या इतर भागांमध्ये देखील खाकी वर्दीच घातली जाते. फक्त कोलकाता पोलीस हेच पाढंरी वर्दी घालतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.