सध्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. आतापर्यंत अर्धा हंगाम संपला आहे. त्यामुळे एकूण 10 संघांमध्ये प्लेऑफमधील 4 जागांसाठी चुरस पाहायला मिळत आहे. आपली टीम प्लेऑफमध्ये पोहचणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे फारसं लक्ष नाही. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सुखावणारी आहे. आयसीसी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अर्थात रँकिंगमध्ये टीम इंडियाला फायदा झाला आहे. आयसीसीच्या या वार्षिक क्रमवारीत टीम इंडियाने टॉप 3 मध्ये एन्ट्री घेतली आहे. टीम इंडियाला एका स्थानाने फायदा झाला आहे. टीम इंडियाने टेस्ट रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
आयसीसीने शुक्रवारी मे महिन्यातील पहिल्याच दिवशी अर्थात 1 मे रोजी ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षभरात खेळवण्यात आलेल्या सामन्यांसाठी 100 टक्के वेटेज दिलं जातं. तर 2 वर्षांआधी खेळवण्यात आलेल्या सामन्यांचं वेटेज हे 50 टक्के इतकं असतं. तर त्याआधीच्या वर्षातील सामन्यांची किंमत ही शून्य राहते. त्यामुळे रँकिंगमध्ये बदल होतो.
आयसीसीच्या या रँकिंगमध्ये 3 वर्षांआधीच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीची किंमत शून्य झाली. त्यामुळे टीम इंडियाला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. टीम इंडियाने गेल्या 6 महिन्यांपासून एकही कसोटी क्रिकेट सामना खेळलेला नाही. टीम इंडियाने नोव्हेंबरपासून कसोटी सामना खेळलेला नाही. तसेच आयसीसीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाने इंग्लंडला मागे टाकत क्रमवारीत तिसरं स्थान पटकावलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडियाच्या खात्यात 104 गुण आहेत. तर इंग्लंडच्या नावावर 102 गुण आहेत. तर ऑस्ट्रेलिया अर्थात कांगारु पहिल्या स्थानी विराजमान आहेत.
आयसीसीकडून वार्षिक कसोटी क्रमवारी जाहीर
ऑस्ट्रेलियाने 3 गुणांची कमाई केली आहे. ऑस्ट्रेलियाने यासह आपलं अव्वल स्थान आणखी मजबूत केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 131 पॉइंट्स आहेत. तसेच गतविजेता दक्षिण आफ्रिकेनेही 3 गुण मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिका 119 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे रँकिंगमधील पहिल्या 3 संघांमध्ये गुणांबाबत फार अंतर आहे.