पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. भाजप पश्चिम बंगालमध्ये विक्रमी विजयाची तयारी करत असताना, रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी पश्चिम बंगालच्या निकालाची तुलना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांशी केली.
रोहित पवार म्हणाले की, 2024 मध्ये महाराष्ट्रात जसे प्रकार घडले, तसेच बंगालमध्येही घडत आहेत. त्यांनी आरोप केला की, लाखो मतदारांना मतदानापासून दूर ठेवण्यात आले. ते पुढे म्हणाले की, अंदाजे 15 टक्के मतदारांना मतदानाची संधीच दिली गेली नाही. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी एकट्याने लढा देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. भाजपकडून या आरोपांना काय उत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.