Shashikant Shinde : वारकरी संप्रदाय विषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्यात 8 मे रोजी विकास लवांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस सऱद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विकास लवांडे यांना झालेली अटक हा लोकशाहीचा खून आहे. नागरिकांना आपलं मत मांडण्याचा अधिकार सुद्धा आज उरलेला नाही, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली.
हल्ली पोलीस यंत्रणा ही सरकारच्या दबावाखाली काम करते हे वारंवार आणि प्रत्येक वेळेला सिद्ध झालं असल्याची टीका शशिकांत शिंदे यांनी केली. त्याचंच प्रत्यंतर म्हणजे विकास लवांडेंवर ज्यांनी शाईफेक केली त्यांना कुठल्याही प्रकारची अटक झाली नाही. याउलट खोटी तक्रार दाखल करून विकास लवांडेंवरच पोलिस कारवाई केली गेली. पोलिस प्रशासनाने इतकी तत्परता शाई फेकणाऱ्यांवर कारवाई करताना दाखवली असती, तर आम्ही समजू शकलो असतो परंतु न्याय देणारे जर पूर्णपणे सरकारच्या ताटाखालचं मांजर झाले असतील, तर न्याय कोणाकडे मागणार ? दिवस येतात आणि जातात. मी स्वतः व आमदार रोहित पवार वाघोली पोलिस स्टेशन येथे जाऊन आलो आहोत.
विकास लवांडे हे लढणारे सैनिक आहेत, घाबरणारे नाहीत. दडपशाही आणि हुकूमशाही फार काळ टिकत नसते. आता केवळ एका कोक्रोच जनता पार्टीचं नाव समोर आलं तरी देशातल्या तरुणांचा सरकारप्रती किती उद्रेक आहे हे पहायला मिळतंय. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. अश्या पद्धतीने सर्वसामान्यांवर अन्याय होत राहिला तर ही जनताच उठाव करेल आणि नक्कीच त्यावेळेला या हुकूमशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली.
युट्युब वर मिळालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून लवांडे यांनी वारकरी संप्रदाय विषयी आक्षेपार्य विधान केला असल्याचा आरोप एका महिलेने केला होता. संबंधित महिलेने यानंतर वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने लवांडे यांनी आज न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळं पोलिसांनी आज लवांडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु केली आहे.