RCB vs GT, IPL 2026 Final : विराटची चाबूक खेळी, आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, गुजरातचा फायनलमध्ये धुव्वा
GH News June 01, 2026 02:10 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इतिहास घडवला आहे. आरसीबी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चॅम्पियन टीम ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होम टीम गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने मात करत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. गुजरातने वॉशिंग्टन सुंदर याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 12 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. आरसीबीने 18 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 161 धावा केल्या आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. विराट कोहली आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. विराटने बॅटिंगने आरसीबीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. विराटने नाबाद 75 धावांची खेळी केली. तर इतरांनीही बॅटिंग आणि बॉलिंगसह योगदान दिलं. तर गुजरातला पराभवामुळे दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.

पहिल्या डावात काय झालं?

गुजरात टॉस गमावून बॅटिंगसाठी आली. मात्र गुजरातसाठी वॉशिंग्टन सुंदर याचा अपवाद वगळता इतरांना काही खास करता आलं नाही. साई सुदर्शन आणि कॅप्टन शुबमन गिल या दोघांनी निराशा केली. आरसीबीच्या गोलंदाजांनी या दोघांना झटपट आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. गुजरातसाठी नमन धीर याने 20 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक आणि नाबाद 50 धावा केल्या. सुंदरच्या या खेळीमुळे गुजरातला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 155 रन्स करता आल्या. आरसीबीसाठी रसीख सलाम डार याने तिघांना आऊट केलं. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी 1 विकेट मिळवली. तर कृणालने 1 विकेट मिळवून योगदान दिलं.

आरसीबी पंरपरा कायम राखण्यात यशस्वी

आरसीबीने गुजरात विरूद्धच्या अंतिम सामन्यातील विजयासह गेल्या 8 वर्षांपासूनची परंपरा कायम राखण्यात यश मिळवलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 2018 पासून क्वालिफायर 1 जिंकणारी टीमच चॅम्पियन राहिली आहे. आरसीबी यंदा ही परंपरा कायम राखण्यात यशस्वी ठरणार की नाही? याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र आरसीबीने ही परंपरा कायम राखलीय. आरसीबीने क्वालिफायर 1 सामन्यात गुजरातला पराभूत करुन फायनलमध्ये धडक दिली होती.

आरसीबी एकूण चौथी टीम

आरसीबीने या विजयासह एक खास कामगिरी करुन दाखवली आहे. आरसीबी आयपीएल स्पर्धेत 2 ट्रॉफी जिंकणारी चौथी टीम ठरली आहे. आरसीबीआधी चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या 3 संघांनी 2 वेळा ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच आरसीबी चेन्नईआणि मुंबईनंतर सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी तिसरी टीम ठरली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.