Suman Kalyanpurkar: 'सुमन सुगंध' हे सुमन कल्याणपूर यांचे मंगला खाडिलकर ह्यांनी लिहिलेलं चरित्र. ते वाचताना जाणवते की, त्यांच्या जीवनाचा प्रवास अत्यंत खडतर होता. आयुष्यभर सल लागून राहिल, अशी एक घटना त्यांच्या बाबतीत घडली होती आणि त्या घटनेच्या परिघात लता मंगेशकर, सी. रामचंद्र आणि पंडित नेहरू यांच्यासारखी उत्तुंग माणसं होती. 1963 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत 'ऐ मेरे वतन के लोगों' हे अजरामर देशभक्तीपर गीत सादर केले जाणार होते. संगीतकार सी. रामचंद्र यांनी सुरुवातीला हे गाणे गाण्यासाठी सुमन कल्याणपूर यांची निवड केली होती व त्यांच्यासोबत या गाण्याचे तास न् तास सराव देखील पूर्ण झाले होते.
मात्र हे गाणे लता मंगेशकर गाणार असल्याचे त्यांना अचानक सांगण्यात आले. शेवटच्या क्षणी इतकी मोठी ऐतिहासिक संधी हातातून निसटल्यामुळे सुमनजींना प्रचंड मानसिक त्रास झाला. ह्या घटनेची सल आणि संधी हिरावली गेल्याचे दुःख त्यांच्या मनात आयुष्यभर कायम राहिले. त्यांच्या जागी अन्य कुणी व्यक्ती असती तर तिने लता मंगेशकरांना याचा दोष सहज दिला असता!
मात्र चित्र वेगळेच होते. 'ऐ मेरे वतन के लोगो' या ऐतिहासिक गीताची निर्मिती, सुमनताई कल्याणपूर यांच्या कडून करवून घेण्यात आलेली संपूर्ण तयारी आणि ऐनवेळी त्यांना संगीतकारांनी दिलेला नकार, त्यावेळी त्यांच्या मनाची झालेली घालमेल, उद्विग्नता, नाराजी, त्याही परिस्थितीत लतादीदींचा कोणताही दोष नव्हता ह्या साऱ्या घटना आणि त्या बाबतीत त्यांचं म्हणणं, हे सर्व त्यांनी 'सुमन सुगंध'मध्ये अधोरेखित केलेय. रामचंद्र चितळकर ह्यांच्यामुळे हे कसे घडले ह्यावरही त्यात प्रकाश टाकलाय.
भारताच्या स्वातंत्र्यापासून ह्या गीतासंबंधीचा आणि लता मंगेशकर यांच्या बद्दलचा गैरसमज त्यांनी स्वतः होऊन दूर केला. सुमनताई व लतादीदी या दोन महान गायिकांमधील नसलेला परंतु दाखविण्यात येत असलेला संघर्ष यासंदर्भातील मळभ सुमनताईंनी स्वतःच दूर केलं; हा सुमन कल्याणपूर यांच्या मनाचा मनाचा मोठेपणाच म्हटला पाहिजे. सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात जे साम्य होते, त्याने त्यांना कामही दिले आणि दगाही दिला! सुमनताई ह्याकडे योगायोग म्हणून पाहत नाहीत. संधीचा अभाव राहिला हे त्या मान्य करतात. लता दीदींच्या तुलनेत त्यांना खूप कमी गाणी मिळाली आणि प्रसिद्धीही अगदी माफक मिळाली. अमुक एक गाजलेले गाणे त्यांचे आहे हेच मुळी श्रोत्यांना ठाऊक नसे. त्यांची सर्व गाणी लता दीदींची वाटत!
लता दीदींची गाणी सुमन कल्याणपूर यांनी गायली आहेत असं लोक कधी म्हणत नव्हते मात्र सुमन ताईंनी गायलेली गाणी मात्र लोकांना लता बाईंची वाटत! स्वतः सुमनताई याकडे तटस्थपणे आणि सकारात्मकतेने पाहतात. मात्र अनेकांना वाटते की, ह्या दोघीत रंजिश होती; मात्र सुमनताईंनी अशा दृष्टीकोनातून कधीही पाहिले नाही. आपल्यातल्या साम्यामुळेच आपल्याला काम मिळाले हे सांगताना त्यांनी काहीही लपवले नाही. हाच दाखला मोहम्मद रफी यांच्या सुनेने दिला आहे.
यास्मिन खालिद रफी, ह्या मोहम्मद रफी यांच्या सूनबाई! आपल्या सासऱ्यांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे; 'मोहम्मद रफी - माय अब्बा, ए मेमॉयर' ह्या चरित्रात रफी, लता आणि सुमन कल्याणपूर ह्यांच्या एका योगायोगाबद्दल लिहिलं आहे. 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला एक असा टप्पा आला, जेव्हा लता मंगेशकर यांचे मोहम्मद रफी यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांनी त्यांच्यासोबत युगलगीत गायचे थांबवले. त्यांनी जवळपास चार वर्षे एकत्र काम केले नाही, युगल गीत गायली नाहीत.
ह्या काळात लता दीदींनी महेंद्र कपूर यांच्यासोबत आणि तर मोहम्मद रफी ह्यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासोबत गाणी गायली," असे यास्मिन लिहितात. लताबाई आणि रफी ह्यांनी एकत्रित गायलेल्या गाण्यांवरील रॉयल्टीच्या मुद्द्यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. लता दीदींचे म्हणणे होते की, गाण्याच्या रॉयल्टीमध्येही त्यांना काही हिस्सा मिळाला पाहिजे! त्यांनी हा मुद्दा निर्मात्यांसमोर मांडला; रफींनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती.
ट्रँकबार प्रेसने प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकानुसार, लता दीदींच्या अपेक्षेच्या विपरित अशी भूमिका रफींनी घेतली. त्यांचे मत होते की, 'जेव्हा निर्मात्याने गाण्यासाठीचे मानधन गायकाला दिलेले असते तेव्हा गाण्याच्या पुढच्या कमाईत त्याचा वाटा मागण्याचा प्रश्न येत नाही.' रफींनी आपल्या भूमिकेला समर्थन दिले नाही ह्याचे लता दीदींना वाईट वाटले. आपलेच म्हणणे बरोबर आहे ह्यावर त्या ठाम होत्या, त्यांनी रफींसोबत ड्युएट्स गायला नकार दिला.
ज्यांना रफी लता यांचे ड्युएट सॉन्ग हवे होते त्यांना लताबाईंचा पर्याय मिळाला. कोमल, मुलायम आवाजाच्या नि लता दीदींसारख्याच गोड गळ्याच्या सुमन कल्याणपूर अशांची पहिली पसंती राहिल्या. ह्या चार वर्षात त्यांना बऱ्यापैकी काम मिळालं. त्यांची गाणीही लोकप्रिय झाली मात्र ती गाणी त्यांची आहेत हे खूप कमी रसिकांना ज्ञात होतं. लता दीदींच्या जागी सुमन कल्याणपुऱ् फिट बसल्या मात्र रफींच्या जागी महेंद्र कपूर हा पर्याय काही यशस्वी ठरला नाही, कारण ह्या दोन दिग्गज गायकांच्या आवाजाचे पोत भिन्न होते!
रफी लता यांचा वाद म्युझिक इंडस्ट्रीला घातक आहे हे एव्हाना अनेकांच्या लक्षात आले होते. दिवंगत संगीत दिग्दर्शक जयकिशन यांनी अखेरीस दोघांमध्ये समेट घडवून आणला. या प्रकरणानंतर रफी आणि लता यांनी एकत्र रेकॉर्ड केलेले पहिले युगलगीत 'पलकों की छाँव में' या चित्रपटासाठी होते. हे दोघे पुन्हा एकत्र गाऊ लागले आणि सुमन कल्याणपूर यांना मिळणारी गाणी पुन्हा घटत गेली! आपला आवाज सर्वोत्कृष्ट गायिकेसारखा सेम टू सेम असणं ही बाब त्यांच्या मुळावर आली आणि त्यातच त्यांचे नुकसान झाले.
लता बाईंच्या आधी किंवा नंतर त्यांच्या आवाजाचा कालखंड असता तर चित्र खूप खूप वेगळे दिसले असते. जग हायपोथिकल गोष्टीवर चालत नसते असं म्हणत आपण ह्यापासून सुटका करुन घेऊ शकतो मात्र वास्तव हेच होते हे नाकारू शकत नाही. यमन रागावर विलक्षण पकड असलेल्या सुमनताईंचे नाव गंमतीने यमन कल्याणपूर असेही घेतले जाई. त्यांची हिंदीतली तसेच मराठीतली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत, मात्र त्यांना संधी कमी मिळाली आणि प्रसिद्धी कमी मिळाली, हे शल्य त्या लोकप्रियतेला जोडूनच समोर येते ही बाबही कारुण्यपूर्ण आहे!
काही वर्षांपूर्वी दारिद्र्य अवस्थेतील राणू मंडल ह्यांना सिग्नलजवळ गाताना एकाने शूट केले आणि त्या सोशल मीडिया अटेन्शन झाल्या. देशभरात त्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यावेळी लता दीदी हयात होत्या. त्यांनी राणू मंडल यांच्या गायकीबद्दल प्रतिक्रिया दिली होती - 'माझं नाव आणि माझ्या कामामुळं कुणाचं भलं होत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजते. पण मला वाटतं की कुणाचं अनुकरण करून मिळालेलं यश फार काळ टिकत नाही. किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि मुकेश यांची गाणी गाऊन सध्याचे गायक लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. पण ते कायम राहत नाही' ह्या विधानानंतर अनेकांनी लता बाईंवर टीका केली होती मात्र आज राणू मंडल यांची अवस्था पाहून ते भाष्य परखड असले तरी वास्तववादी होते हे लक्षात येते.
हेच विधान आपण काळाच्या कसोटीवर अन्यायकारक अशा दृष्टीकोनातून सुमन कल्याणपूर ह्यांच्या बाबतीत लावून अभ्यासले तर लक्षात येईल की, सुमनताई कॉपी नव्हत्या! तो त्यांचा नैसर्गिक स्वर होता. ती त्यांची स्वतःची शैली होती मात्र त्या स्वरात नि शैलीत साम्य होते, मात्र ते इतके अत्युच्च दर्जाचे होते की त्यांना कधी कुणी हिणवले नाही की कमी लेखले नाही! हे साम्य, हेच त्यांचे दुर्भाग्य ठरले अन्यथा त्यांचे नावही यशाच्या शिखरावर असले असते. त्यांच्याविषयी बोलताना लिहिताना अनेकजण त्यांच्यात आणि लताबाईंच्यात रायव्हलरी असल्यासारखं भासवतात मात्र खुद्द सुमनताईंनी मात्र असं कधीही कुठेही म्हटलेले नाही, त्यांच्या चरित्रात देखील तसा उल्लेख नाही.
सुमन कल्याणपूर ह्यांची गायकी श्रेष्ठ आणि दर्जेदार होती. त्यांच्या गाण्यातली विविधता आणि रागदारीचे बारकावे ह्याची साक्ष देतात. मराठी संगीतप्रेमी रसिकांचे त्यांच्यावर अंमळ जास्तीचे प्रेम होते कारण ज्या काळात रेडिओचे वर्चस्व होते, ज्या काळात भावगीतांचा वरचष्मा होता त्या काळात सुमन कल्याणपूर ह्यांनी मराठी संगीतसृष्टीच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर राज्य केलं!
सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर यांच्यातले साम्य किती भयंकर होते, ह्याचा एक दाखला देऊन थांबतो. 1964 मधल्या 'फरियाद' सिनेमात 'हाल-ए-दिल उनको सुनाना था सुना ना गया, सुनाया ना गया' हे केदार शर्मा ह्यांचे नितांत सुंदर गाणं आहे. सुमनताईंनी ते गायलं आहे. 1964 मधल्याच 'जहां आरा' चित्रपटातलं 'हाल-ए-दिल यूं उन्हे सुना गया' हे लता बाईंनी गायलेलं गाणं तुम्ही ऐका! मग तुम्ही आश्चर्यचकित होऊन स्तब्ध व्हाल आणि मला खात्री आहे की तुम्हीही म्हणाल की, 'होय, सुमन कल्याणपूर ह्यांच्यावर अन्याय झालाय!' एका गुणी गायिकेची कदर होऊ शकली नाही हे वास्तव आहे!
अलविदा सुमनजी..