कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
गणेश लटके June 01, 2026 10:43 PM

सोलापूर माढा : सध्या राज्यात तापमानाचा पारा 40 ते 45 अंशाच्या घरात गेला आहे. वाढत्या तापमानामुळं नदी नाले, विहीरी बोअरवेल कोरडे पडले आहेत. यामुळं विविध भागात शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशीच स्थिती माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांची झाली आहे. सीना नदी कोरडी पडली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची पिकं जळू लागली आहेत. त्यामुळं सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडावं या मागणीसाठी आज माढा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढाला. पुढच्या तीन दिवसात सीना कोळेगाव धरणातून जर सीना नदीत पाणी सोडले नाहीतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार खासदार राजकीय नेत्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरु देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 


... तर पाऊस पडल्यावरही कोळेगावचे पाणी सीना नदीत सोडू नका

ज्यावेळी पाऊस पडला जातो त्यावेळी सीना कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात सीना नदीत पाणी सोडले जाते. मागील वर्षी अचानक सीना कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सीना नदीत सोडण्यात आला, परीणामी सीना नदीला महाभयंकर अशा प्रकारचा पूर आला होता. यामुळं शेती पिकांचं, जमिनींचं, घराचं मोठं नुकसान झालं होतं. पाऊस पडल्यावर पाणी सोडले जाते, तर मग आताच का पाणी सोडले जात नाही? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. आता जर पाणी सोडले नाहीतर पाऊस पडल्यावर देखील सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडू नये असी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तुम्हाला जिथे पाणी सोडायचे तिथे सोडा मात्र सीना नदीत पाऊस पडल्यावर पाणी सोडून नका असेही शेतकीर म्हणाले. आम्ही काय पाकिस्तानमध्ये राहतो का? असा सवालही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळं पुढच्या तीन दिवसात पाणी सोडावं अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरु देणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. 


नेमक्या काय आहेत मागण्या?

1) सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत शेतीसाठी त्वरीत पाणी सोडण्यात यावे.
2) उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करुन पाण्याचे समान वाटप करावे
3) पुरग्रस्त शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत देण्यात यावी
4) 2 हेक्टरपेक्षा जास्त जमिन असलेल्या शेतकऱ्यांना खरवडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी
5) सीना नदीवरील सर्व बंधारे दुरुस्त करुन नवीन दारे बसवण्यात यावीत
6) ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पूर्ण क्षमतेने 12 तास वीज देण्यात यावी


मोर्चाला मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांची उपस्थिती

सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडावं या मागणीसाठी आज माढा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाचे नेते मनोज साठे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार पक्षाने देखील पाठिंबा दिला होता. शरद पवार पक्षाचे नेते संजय पाटील घाटणेकर देखील यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर गावोगावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पाणी आमच्या हक्काचं आहे, ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली.

राज्यात उन्हाचा चटका वाढला, विहिरी, बोअरवेल पडले कोरडे, परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाणीटंचाई, टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरु 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.