मुंबई : राज्यातील धडाकेबाजी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी अन्न व औषध विभागाचा पदभार स्वीकारल्यापासूनच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दोनच दिवसांत
अन्न व औषध प्रशासनाचा चार्ज स्वीकारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले असून अवैध गुटखा, भेसळयुक्त पदार्थांच्या दुकानांवर कारवाई केल्यानंतर आता पुढील अध्याय सुरू केल्याचं दिसून येतं. आत्तापर्यंत 28 दुकाने सील करण्यात आली असून 33 आरोपींना अटकही करण्यात आल्याची माहिती आहे. आता, तुकाराम मुंढेंनी टीव्ही आणि पेपरात मिसलीडिंग ॲडव्हर्टायझिंग करणाऱ्या सेलिब्रिटींवर (Celebrity) कारवाई करण्याचा बडगा उगरला आहे.
ब्रँड आणि मोठमोठी आश्वासने देत, फायदे दाखवत कंपन्यांकडून अनेकदा ग्राहकांची फसवणूक केली जाते. चुकीच्या आणि मिसलिडिंग जाहिराती दाखवून ग्राहकांना उत्पादन घेण्यास भाग पाडले जाते. मात्र, आता मिसलीडिंग ॲडव्हर्टायझिंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे. यापुढे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता खपवून घेतल्या जाणार नाहीत, विशेष म्हणजे भ्रामक जाहिरातींमध्ये सहभागी सेलिब्रिटींवरही कारवाई होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ग्राहक संरक्षणासाठी प्रशासनाची आक्रमक भूमिका असणार आहे. त्यामळे, तुकाराम मुंढे पुन्हा आपल्या विभागात सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या या कर्तव्याचे कौतुक होत आहे.
उत्पादन तयार करणाऱ्या उत्पादकांपासून कारवाईला ह्या सुरुवात होणार आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाची नजर राहणार आहे. मात्र, ग्राहकांपर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून उत्पादन पोहोचवणाऱ्या या प्रक्रियेत सहभागी जाहिरातदार, उत्पादक आणि ब्रँड अॅम्बेसेडर सर्वांची जबाबदारी निश्चित होणार आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात कठोर पावले उचलण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा नवीन कार्यभार स्वीकारला आहे. पदभार हाती घेताच त्यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कडक इशारा दिला होता. त्यांनी सर्व विभागांतील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तातडीने धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत कडक निर्देश दिले. आयुक्तांच्या या आदेशानंतर यंत्रणेनं कमालीची तत्परता दाखवत बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये एकाच वेळी धडक कारवाई केली.