Dawood Ibrahim : दाऊदचा खास झिंगाडा, एक ISI एजंट आणि..या चौघांवर सोपवलेली देश हादरवण्याची जबाबदारी, मुंबईत तर हे लोक..
GH News June 04, 2026 04:11 PM

देशाची राजधानी दिल्लीला हादरवण्याचं एक मोठं कारस्थान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उधळून लावलं आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI, पाकिस्तान आणि दुबईत सक्रीय असलेलं अंडरवर्ल्ड आणि भारतातील त्यांचे प्यादे हे मिळून भारतातील वेगवेगळ्या शहरात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या तयारीत होते. त्यांच्या रडारवर फक्त सर्वसामान्य नाही, तर सुरक्षा संस्था, पोलीस आणि देशातील महत्वाच्या सरकारी संस्था सुद्धा होत्या. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका दीर्घ ऑपरेशननंतर हे सर्व नेटवर्क मोडून काढलं. या कारवाईत देशाच्या वेगवेगळ्या भागातून 8 आरोपींना अटक करण्यात आली. यात उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, पंजाब आणि नेपाळचे लोक होते.

वेळेतच हे दहशतवादी पकडले गेले म्हणून अन्यथा दिल्ली, मुंबई, पंजाब आणि चंदीगड सारख्या शहरात मोठे दहशतवादी हल्ले झाले असते, असा पोलिसांचा दावा आहे. या संपूर्ण मॉड्युलमध्ये पाकिस्तान आणि दुबईत बसलेले हँडलर सर्व ऑपरेट करत होते असं तपासात समोर आलय. यात प्रमुख नाव अमीर भट्ट, शाहजाद भट्टी, मुन्ना झिंगाडा आणि यावर खान यांचं आहे. हे लोक सोशल मीडिया, एन्क्रिप्टेड Apps आणि दुसऱ्या डिजिटल माध्यमातून भारतातील युवा आणि गुन्हेगारांशी संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. मुन्ना झिंगाडा हा दाऊद गँगसाठी काम करतो.

भरतीची पद्धत खूप खतरनाक होती

यांची पद्धत खूप खतरनाक होती. ज्या युवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, पैशासाठी ते काहीही करायला लगेच तयार होतील अशा मुलांचा शोध घेतला जायचा. त्यांना छोटी-छोटी काम देऊन नेटवर्कशी जोडलं जायचं. त्यांच्यावर विश्वास बसल्यानंतर त्यांना शस्त्र, पैसा आणि टार्गेट दिलं जायचं. स्पेशल सेलने शाहजाद भट्टीशी संबंधित नेटवर्कच्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं होतं. पाकिस्तान आणि दुबईत बसलेले लोक नवीन भरती करतायत अशी गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती. टेक्निकल टेहळणी, मोबाइल सर्विलान्स, सोशल मीडियावरील हालचाली आणि मानवी स्त्रोताच्या माध्यमातून मिळालेली माहिती एकत्र करुन पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली.

मुंबई कनेक्शन कसं समोर आलं?

चौकशी दरम्यान पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून 23 वर्षांच्या विजयला अटक केली. विजय दुबई आणि पाकिस्तानातील हँडलर्सच्या संपर्कात होता. 14 मे रोजी पुणे स्पेशल सेलने त्याला अटक केली. विजयची अटक टर्निंग पॉइंट ठरली. विजयच्या चौकशीतून झारखंडच्या नितीश पासवानच नाव समोर आलं. विजय आणि नितीशच्या चौकशीतून तपासाचा फेरा मुंबईपर्यंत पोहोचला.

मुंबईत ग्रेनेड हल्ले आणि फायरिंगची जबाबदारी

27 मे रोजी तौकीर रिजवान अहमद शेख आणि साजिद महबूब शेख उर्फ अरबाज खानला पोलिसांनी अटक केली. दोघे ISI चे हँडलर यावर खान आणि मुन्ना झिंगाडाच्या संपर्कात होते. त्यांनी मुंबईत राहणाऱ्या हुजैफा नावाच्या व्यक्तीची भरती केली होती. मुंबई पोलिसांनी हुजैफाला पकडलं. तौकीर आणि अरबाजला दिल्ली आणि मुंबईत ग्रेनेड हल्ले आणि फायरिंगची जबाबदारी दिली होती. त्यांना संभाव्य टार्गेटची रेकी करणं आणि योग्य वेळेची वाट पाहण्यास सांगण्यात आलं होतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.