ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge….. त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
Tv9 Marathi June 05, 2026 02:45 PM

कोकणातील राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने पुन्हा चर्चेत आले आहेत. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या निर्णयानंतर अवघ्या काही तासांत बाळ माने यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बाळ माने यांनी आपला अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे ते भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याने या निर्णयाला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या माघारीनंतर ठाकरे गटाने तातडीने कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

या सर्व घडामोडींनंतर बाळ माने यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर एक सूचक संदेश शेअर केला. “मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करतो, त्याच दरवाजातून प्रेम आणि विश्वास बाहेर पडतात. Revenge is just a waste of time,” असे त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटले आहे. या पोस्टचा नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

याशिवाय त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणारे स्टेटसही शेअर केले आहे. बाळ माने यांची राजकीय कारकीर्द भाजपमधून सुरू झाली असल्याने त्यांच्या संभाव्य घरवापसीच्या चर्चांनाही आता वेग आला आहे. आगामी काळात बाळ माने कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे कोकणासह राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.