राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. कोकणातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना त्यांनी ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळा माने यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर विनायक राऊत यांनी त्यांच्यावर 25 कोटी रुपये घेऊन माघार घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत राऊत यांच्यावरच पलटवार केला.
“विनायक राऊत हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलत आहेत. मात्र कोकणात त्यांच्या पक्षाचं नेमकं काय स्थान उरलं आहे, हे त्यांनी आधी दुर्बीण घेऊन शोधावं,” असा टोला तटकरे यांनी लगावला. तटकरे पुढे म्हणाले की, एकेकाळी कोकण हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला होता. मात्र आता तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा राहिलेला नाही. “कोकणात ठाकरे सेनेला दोन अंकी आकडाही गाठता आलेला नाही. त्यामुळे इतरांवर आरोप करण्याआधी स्वतःच्या राजकीय अपयशाचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी कोकणातील महायुतीच्या ताकदीचाही उल्लेख केला. “आज कोकणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा, भाजपचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा भक्कम प्रभाव आहे. महायुतीने कोकणात मजबूत बालेकिल्ला उभा केला आहे,” असा दावा तटकरे यांनी केला.
तसेच, “तुमचे मोजकेच 45 मतदार असताना दुसऱ्यांवर ठपका ठेवण्यात अर्थ नाही. खासदार म्हणून आपण कुठे कमी पडलो, याचं आत्मपरीक्षण विनायक राऊत यांनी करावं,” असा सल्लाही तटकरे यांनी दिला. दरम्यान, तटकरे यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र होताना दिसत आहे.