Best Employee Strike : मुंबईत धावणारी बेस्ट ही अविरतपणे काम करत राहावी यासाठी रोज हजारो कर्मचारी धडपडत असतात. दरम्यान, आता याच बेस्टचे आजी-माजी कर्मचारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बेस्टचे आजी-माजी कर्मचारी 18 जूननंतर बेदमुदत संपावर जाणार आहेत. बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे आता मुंबईत चाकरमान्यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.
बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?मिळालेल्या माहितीनुसार बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. बेस्टच्या माजी कर्मचाऱ्यांचे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकित पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत. याच कारणामुळे कामगारांत तीव्र नाराज आहे. परिणामी आता बेस्टच्या एकूण 12 कामगार संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना केली आहे. या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 8 जून रोजी कामगारांचा मेळावादेखील आयोजित करण्यात आला आहे. कृती समितीच्या वतीने प्रशासनाने कामगारांच्या मागण्यांबाबत 18 जून रोजीपर्यंत ठोस निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटमही दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 18 जूननंतर आम्ही बेमुदत संपावर जाऊ, असा इशाराही बेस्टच्या कर्मचारी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरटीओचे कर्मचारीदेखील संपावर जाणारवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणाच्या भूमिकेमुळे आरटीओ कर्मचारी आक्रमक झाले आहेत. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनही दुर्लक्ष करत आहे, असा आरोप आरटीओ कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत आरटीओ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. दरम्यान, आता आरटीओ संघटना संप करणार आहेत. येत्या 9 जून रोजी आरटीओ कर्मचारी एका दिवसासाठी संपावर जाणार आहेत. तरीही मागण्या मान्य न झाल्यास 16 जूनपासून आम्ही बेमुदत संपावर जाऊ, असा इशाराही आरटीओच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सरकार नेमकं काय करणार?दरम्यान, आता सरकार बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे कधी लक्ष देणार, बेस्टच्या माजी कर्मचाऱ्य़ांचे थकित पैसे देण्याचा निर्णय होणार का? तसेच आरटीओच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडेही लक्ष दिले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.