IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड टी 20I सामन्यांच्या वेळत बदल! कारण काय?
GH News June 09, 2026 02:10 AM

टीम इंडियाने आयपीएल स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या मोहिमेची यशस्वीरित्या सुरुवात केली. टीम इंडियाने तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यात पराभूत केलं. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिल्यांदा द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात एकूण 2 टी 20i सामने होणार आहेत. तर इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने 6 जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. मात्र अवघ्या 2 दिवसांत मोठी अपडेट समोर आली आहे. उभयसंघात होणाऱ्या टी 20i सामन्यांच्या वेळात बदल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मायदेशात होणाऱ्या टी 20i सामन्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डे-नाईट सामन्यांना नियोजित वेळेच्या 1 तासाआधी सुरुवात होणार आहे. टीआरपी वाढावा या हेतूने सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, इंग्लंड-भारत यांच्यातील 5 पैकी 3 टी 20i सामने हे डे-नाईट असणार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून गेल्या वर्षी या मालिकेचं वेळापत्रक जाहीक करण्यात आलं होतं. तेव्हा भारतीय वेळेनुसार डे-नाईट सामन्यांना रात्री 11 वाजता सुरुवात होणार होती. मात्र आता क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार 11 ऐवजी रात्री 10 वाजता सुरुवात होणार आहे.

वेळ बदलाचं कारण काय?

रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ब्रॉडकास्टर्ससह केलेल्या चर्चेनंतर वेळेत बदल केला आहे. टीम इंडियाचे सामने कधीही आणि कुठेही होवोत त्यासाठी चाहते स्टेडियममध्ये उपस्थितीत लावतात. तर टीव्ही आणि मोबाईलवर पाहणाऱ्यांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे सामन्यांना 1 तास आधी सुरुवात झाल्यास प्रेक्षक जास्तीत जास्त सामने पाहतील असा अंदाज आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टर्सला फायदा होईल. वेळेत बदल करण्यामागे आर्थिक कारण आहे.

इंग्लंड-इंडिया टी 20i मालिका

दरम्यान इंग्लंड-इंडिया यांच्यात 1 ते 11 जुलैदरम्यान या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. श्रेयस अय्यर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.