Kalyan Crime : गाडीला कट मारल्याचा वाद अन् घमासान… कल्याण पूर्वेत गँगवॉरचा थरार, पोलिसांनी दाखवला इंगा
Tv9 Marathi June 11, 2026 12:45 PM

मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये अचानक गँगवॉरची थरारक घटना दिसून आली. कल्याण पूर्वेतील आत्माराम नगर परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास दोन गँगमधील जुन्या वादातून गोळीबाराची घटना घडली. गाडीला कट मारण्याच्या शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी आणि गोळीबारात झाले. या घटनेत राहुल वर्मा हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कल्यामध्ये दहशतीचे वातावरण होतं. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी प्रेम उर्फ गुंडा राजपूतसह तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार मारामारी करणारे हे तरूण अभी आणि दही या दोन्ही गँगचे सदस्य असून तीन ते चार राऊंड फायर झाले. घटनास्थळी बंदुकीची मॅक्झिन पिस्तूल देखील मिळाली आहे. दरम्यान पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलं त्या आरोपींपैकी काही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहे .

पोलिसांनी काढली धिंड

गँगवॉरच्या या घटनेमुळे परिसरातील लोक दहशतीखाली होते. मात्र ही हशत कमी करण्यासाठी ताब्यात असलेल्या आरोपींची पोलिसांनी डायरेक्ट रस्त्यावर धिंडच काढली . सध्या या प्रकरणी काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र परिसरात वाढता तणाव पाहता या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

नेमकं काय झालं ?

कल्याण पूर्वेतील आत्माराम नगर परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास गोळीबाराची घटना घडून परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, कोळसेवाडी परिसरातील अभी आणि दही गँग तसेच प्रेम उर्फ गुंडा राजपूत आणि बुंदी गँग यांच्यात जुन्या वादातून संघर्ष झाला. गाडीला कट मारण्याच्या अगदी शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादानंतर दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी हाणामारी झाली आणि त्यानंतर तीन ते चार राऊंड गोळीबार झाल्याची माहिती समोर आली.

या गोळीबारात राहुल वर्मा या तरुणाच्या पायाला गोळी लागली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रेम उर्फ गुंडा राजपूत आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. मात्र गोळीबारामुळेत्या परिसरात राहणारे नागरिक चांगलेच धास्तावले, ते दहशतीखाली होते. परिसरातील आणि लोकांच्या मनातील हीच दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची धिंड काढत त्यांच्याकडून उठाबश्या काढून घेतल्या. सध्या आत्माराम नगर परिसरात तणावाचे वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.