तात्या लांडगे
सोलापूर : येथील अवंती नगरातून चोरट्याने सूर्यभान पाटील यांची कार (एमएच १३, डीई ३०८४) चोरली होती. कारमधून आलेले चोरटे उमरग्याच्या दिशेने पसार झाले, पण त्यांनी सर्व टोल नाके चुकवले होते. तरीपण, फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरट्याला तेलंगणातून शोधले. त्याने चोरलेली सोलापुरातील एक, तुळजापूर (जि. धाराशिव), खदान (जि. अकोला), शिरपूर (जि. यवतमाळ) या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरलेल्या चार दुचाकीही जप्त केल्या आहेत.
चोरटे सोलापुरातील कार चोरून उमरगा, औसा, लातूर, उदगीर, मुखेडमार्गे पसार झाले होते. पोलिसांना या मार्गावर चोरट्यांच्या कारचा क्रमांक (एमएच २२, एएम १०३५) सीसीटीव्हीतून मिळाला. आता चोरटे सापडणार म्हणून पोलिसांचे पथक कार क्रमांकावरून परभणीला गेले. मात्र, ती कार दोन वर्षांपासून संभाजीनगर येथील शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवल्याचे समजले. चोरट्यांनी बनावट नंबरप्लेट लावून पोलिसांची दिशाभूल केली होती. सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने चोरट्यांचा नव्याने तपास सुरू केला. मुखेडपासून पुढे सीसीटीव्ही तपासायला सुरवात केली. तेथून पोलिस तेलंगणातील बोधन गावात पोचले.
तेलंगणात प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या गाडीची मूळ नंबरप्लेट बसविली होती. सलग १५ दिवस गुन्हे प्रकटीकरण पथक जिल्ह्याबाहेर होते. त्या क्रमांकाचा शोध घेत पोलिस निझामाबादपर्यंत गेले. ६ जूनला तेथील पोलिसांची मदत घेऊन मेहमूद शेख-खान (वय ३२, रा. गौतम नगर, निझामाबाद, तेलंगण) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली, त्यावेळी त्याने साथीदार हजरत खान (रा. कुर्ला) याच्यासोबत विविध जिल्ह्यांतून कार चोरल्याची कबुली दिली. आता पोलिसांचे पथक अटकेतील चोरट्याचा साथीदार हजरत खान याच्या शोधासाठी मुंबईला रवाना झाले आहे.
५०० किलोमीटरपर्यंत ‘सीसीटीव्हीं’ची तपासणी
कार चोराच्या शोधासाठी फौजदार चावडी पोलिसांनी ५०० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही तपासले. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक क्षीरसागर, हवालदार भाऊ कसबे, अमोल खरटमल, रवी धेंडे, कृष्णात बडुरे, विनोद पुजारी, विनोद व्हटकर, कुमार शेळके, शशिकांत दराडे, शिवानंद भिमदे, सूर्यकांत दराडे, अतिष पाटील, विनायक जाधव, अजय चव्हाण, ज्ञानेश्वर गायकवाड, पंकज घाडगे, आयाज बागलकोटे, सौरभ पाटील, मच्छिंद्र राठोड, नितीन मोरे, दत्तात्रय कोळवले यांच्या पथकाने पार पाडली.