जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार, महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा..
Tv9 Marathi June 13, 2026 03:45 AM

जळगाव विधान परिषद निवडणुकीचा तिडा अखेर सुटला आहे. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अखेर महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक पाठोपाठ जळगाव येथील तिडा देखील सुटला आहे. त्यामुळे महायुतीच्या या दोन जागांवरील बंडखोरांना शांत करण्यात महायुतीला अखेर यश आले आहे.

जळगाव विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली असून त्यांच्या आदेशानुसार आपण महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे रेश्मा काळे यांनी स्पष्ट केले आहे. मी माझा प्रचार थांबवत असून महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचेही रेश्मा काळे यांनी टीव्ही नाईन मराठी बोलताना स्पष्ट केले आहे.

आज सकाळपासून नॉट रिचेबल असलेल्या रेश्मा काळे यांनी अखेर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर त्यांची भूमिका अखेर स्पष्ट करत महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जळगावच्या विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा हा तिढा अखेर सुटला आहे.

एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर माघार…

नाशिकचा तिडा सुटला होता, मात्र जळगावात पेच कायम होता. जळगावात संख्याबळ भाजपाच्या पारड्यात असल्याने निर्धास्त असलेल्या भाजपाला बंडखोरीचा फटका बसला होता.  येथे भाजपाने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटातील रेश्मा काळे यांनी येथे अपक्ष म्हणून बंडाचे निशाण फडकवले होते. मात्र, आता रेश्मा काळे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माघार जाहीर केली आहे. त्यामुळे नाशिक बरोबरच जळगावमधील बंडखोरीचा प्रश्न सुटला आहे. राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांवर निवडणूका होत आहेत. त्यातील सहा जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय झाला असून आता ११ जागांवर येत्या १८ जूनला निवडणूक होणार आहे. या ११ जागांवर महायुतीचा विजय होईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.