जळगाव : अधिक मास म्हणजेच धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचा महिना संपला आहे. मात्र, धोंडे जेवणाच्या कार्यक्रमावरुन भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा दिसून आली. जावयांनी आणि सासरच्या मंडळींनी कार्यक्रमाचे व्हिडिओ देखील व्हायरल केले आहेत. तर, काही नेतेमंडळींनी आपल्या मतदारसंघातही (Jalgaon) असे कार्यक्रम घेतले. त्यावरुन, आता विधानपरिषद सभापती राम शिंदे (Ram shinde) आणि शरद पवाराच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा Rohini Khadse (रोहिणी खडसे) यांच्यात शाब्दिक वाद रंगल्याचं दिसून आलं.
आम्ही रोजगार मागितला, मूळ प्रश्नावर बोललो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिर्ची लागली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सभापती राम शिंदे यांच्यावर नाव न घेता केली आहे. सभापती राम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मतदारसंघात जाहीर धोंडे जेवणाचा कार्यक्रम घेतला होता. त्यावरून रोहिणी खडसेंनी, धोंडे जेवणाऐवजी रोजगार मेळावा आयोजित करा असा सल्ला राम शिंदे यांना दिला होता. त्यानंतर, राम शिंदे यांनीही रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली. आता, रोहिणी खडसेंनी पुन्हा एकदा राम शिंदेंवर बोचरी टीका करत प्रत्त्युत्तर दिल.
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, आम्ही रोजगार मागितला, मूळ प्रश्नावर बोललो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिर्ची लागली. मग धोंड्याने हिंदू संस्कृती जपण्याच्या बाता मारल्या. यांचं हिंदुत्व किती दुटप्पीपणाचे आहे बघा… हे गुंडांना पोसतात, त्यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत करतात. ज्या गुंडांनी असंख्य लोकांची हत्या केली, अनेकांना त्रास दिला, त्यांना हे मदत करतात. आपला हिंदू धर्म हे सांगतो का ? नाही !, असे म्हणत रोहिणी खडसेंनी राम शिंदेंना टोला लगावला आहे. निलेश घायवाळ, युवराज काशीद आणखी किती नावे घेऊ? ज्यांना या धोंड्याने मदत केली आहे. मी जर यांची कुंडली काढायचं ठरवले तर राजकारणाला ‘राम-राम’ करावा लागेल, असेही रोहिणी खडसेंनी म्हटले आहे.
रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचं महत्त्व काय समजणार असा टोला राम शिंदे यांनी रोहिणी खडसेंच्या टीकेला उत्तर देताना लगावला होता. राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे गावातील मुली आणि जावयांसाठी धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या आयोजनावरुन रोहिणी खडसेंनी टीका केली होती.