शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या संदर्भात ते लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील देणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे, सर्व खासदार हे आमच्यासोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यावर बोलताना शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
पक्षाचे आर्धे अधिक लोक त्याच गटाचे , मग त्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन करायचा. मग त्यातल्याच एकाने त्या गटाचा नेता व्हायचं. मग त्यांनी आम्हीच स्वतंत्र आणि ओरिजनल पक्ष आहेत, असं सांगायचं. मग पक्षातून बाजुला पडलेल्या पक्षाने भाजपला पाठिंबा द्यायचा. ही पद्धत आधी शिवसेनेसाठी आणि नंतर राष्ट्रवादीसाठी वापरण्यात आली. उद्या कदाचित पंजाबमध्ये आपसाठी देखील ही पद्धत वापरली जाईल. या सगळ्यांमधून एक गोष्ट आपल्या लक्षात येत आहे का? हे सगळं जे होतय, त्याला कारण एकच आहे, भाजप निरपेक्ष पद्धतीने निवडणुका लढवू शकत नाही. भाजप जनमत मिळू शकत नाही, भाजपच्या पाठिमागे जनमत नाही. हे भाजपला पक्क माहीत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या यंत्रणा हाताशी धरून भाजपा निवडून आलेल्या लोकांनाच पुन्हा आपल्या बाजुने वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असं यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विशेष म्हणजे जे लोक बाहेर पडतात त्यांना एक स्क्रिप्ट देखील दिली जाते. शिवसेनेला हिंदुत्वाची स्क्रिप्ट, राष्ट्रवादीसाठी नेतृत्वाचा मुद्दा, तर तृणमूल काँग्रेससाठी कदाचित अजून आयटी सेलने स्क्रिप्ट लिहिलेली नाहीये, असा हल्लाबोल यावेळी सुषमा अंधारे यांनी केला आहे. दरम्यान रविवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला 9 पैकी प्रत्यक्षात चारच खासदार उपस्थित होते, पाच खसादर हे ऑनलाईन उपस्थित होते, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.