ठाकरे गटाचा नवा राहुल शेवाळे कोण? कुणाच्या नेतृत्वात बंड? मंत्रिपद… इन्साईड स्टोरी काय?
GH News June 17, 2026 02:12 PM

बरोबर चार वर्षानंतर पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. चार वर्षापूर्वी ठाकरे गटाचे 40 आमदार फुटले होते. त्यानंतर 12 खासदारांनी बंड केलं होतं. त्यावेळी ठाकरे गटाचे तत्कालीन खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात हे बंड झालं होतं. त्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पुन्हा एकदा आता तीच स्क्रिप्ट लिहिली जात आहे. यावेळीही ठाकरे गट फुटला आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटले आहेत. फक्त फुटीराचं नेतृत्व करणारा नेता वेगळा आहे. आताच्या ठाकरे गटातील बंडखोरांचा नवा राहुल शेवाळे कोण? अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगली आहे.

ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आणि संजय दिना पाटील आदी सहा खासदार वेगळे होण्याच्या तयारीत आहेत. या खासदारांनी काल दिल्ली गाठली. शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या सहाही खासदारांची मध्यरात्री दिल्लीत खलबते झाली. यात रणनीती ठरली गेली आहे. आज हे सहाही खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून स्वतंत्र गट स्थापन करण्याचं पत्र देतील. लोकसभा अध्यक्षांनी गटाला मान्यता देताच ठाकरे गटातील फुटीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

नवा राहुल शेवाळे कोण?

चार वर्षापूर्वी म्हणजे जुलै 2022 मध्ये ठाकरे गटातील खासदारांनी बंड केलं होतं. 19 पैकी 12 खासदारांनीही बंड केल्याने शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप झाला होता. या फुटीर खासदारांचं नेतृत्व राहुल शेवाळे यांनी केलं होतं. राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून वेगळा गट स्थापन करण्याचं पत्र दिलं होतं. त्याला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली होती. त्यानुसार राहुल शेवाळे हे लोकसभेतील गटनेते आणि भावना गवळी या मुख्यप्रतोद बनल्या होत्या. त्यानंतर हे खासदार शिंदे गटात सामील झाले होते. तीच स्क्रिप्ट चार वर्षानंतर लिहिली जात आहे. ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटले आहेत. आज ते लोकसभा अध्यक्षांना भेटून वेगळा गट स्थापन करणार आहेत. मात्र, या फुटीर गटाचा नेता कोण आणि मुख्यप्रतोद कोण? हे मात्र गुलदस्त्यात आहे. फुटीर गटाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याचं नाव अजून समोर आलेलं नाहीये. या नेत्याचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात बंडखोर खासदार आणि शिंदे गटाला कमालीचं यश आलं आहे.

मंत्रिपदावर बोळवण?

या फुटीर खासदारांपैकी एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार आहे. कॅबिनेट मंत्रिपदी या खासदाराची वर्णी लागणार आहे. संजय जाधव, संजय देशमुख आणि ओमराजे निंबाळकर या तीन खासदारांपैकी एकाला मंत्रिपद दिलं जाणार आहे. त्यामुळे या तीनपैकी कोणता खासदार मंत्रिपद गळ्यात पाडून घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर इतर खासदारांची संसदीय समित्यांवर नियुक्ती करून बोळवण केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या गोष्टींना अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही. कालांतराने, यथावकाश सर्व गोष्टी बाहेर आल्यावरच बंडाची किंमत काय होती हे कळेल, असं जाणकार सांगत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.