Sanjay Raut : किती खासदार हजर राहणार? ठाकरे गटाच्या बैठकीला निघण्याआधी संजय राऊत यांनी दिली महत्वाची माहिती
Tv9 Marathi June 18, 2026 02:45 PM

चार वर्षानंतर उद्धव ठाकरे गटात पुन्हा फूट पडली आहे. दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी 6 जणांनी बंडखोरी केल्याची चर्चा आहे. पक्षात झालेल्या या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे गटाने आज खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी लोकसभेतील ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी व्हीप जारी केला आहे. व्हीप जारी केल्यानंतर पक्षाच्या आमदार, खासदारांना बैठकीला, सभागृहात यावच लागतं. अन्यथा ते पक्षादेशाचं उल्लंघन मानलं जातं. आज ठाकरे गटाच्या या व्हीपचं किती खासदार पालन करतात, त्यावरुन फुटीची कल्पना येईल. आज बैठकीला निघण्याआधी शिवसेने नेते संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यात संजय राऊत म्हणाले की, “व्हीप काढून बैठक बोलवली आहे. पक्षाचा आदेश असतो तो पाळावा लागतो. महत्वाच्या विषयावर खासदारांची चर्चा करणं आवश्यक आहे. प्रत्येक खासदारापर्यंत व्हीप पोहोचला आहे” “अनेकांना फोनवर निरोप दिला. व्हॉट्सअपवरही मेसेज दिला आहे. व्हीप जारी केला आहे. तुम्ही ज्या बातम्या दाखवत आहात त्यावरून आमच्याकडे 9 खासदार आहेत पण ते 15 होतील असं वाटतय. आम्ही बैठकीला जात आहोत. उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. त्यांनी माहिती घेतली. चर्चा केली. सूचना केल्या. ही रेग्युलर प्रोसेस आहे. यापूर्वीही अशा प्रकारचा व्हीप जारी करण्यात आलेला आहे” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. बैठकीला किती खासदार हजर राहणार? या बद्दल राऊतांकडे कुठलही उत्तर नव्हतं.

कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा

व्हीप झुगारुन गैरहजर राहिले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अरविंद सावंत यांनी दिला. “मी व्हीप बजावला आहे. मला अधिकार आहे. प्रतारणा केली तर आम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करू” असं अरविंद सावंत म्हणाले. बंडखोर झालेले सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याची चर्चा आहे. हे सहाखासदार अजूनपर्यंत समोर येऊन बोललेले नाहीत. येत्या दोन-तीन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.