ठाकरे गटाला जय महाराष्ट्र.. ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेत..
Tv9 Marathi June 19, 2026 05:45 PM

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला. ठाकरे गटाकडून आपल्या खासदारांकरिता व्हिप जारी करण्यात आले. मात्र, या 6 खासदारांनी या व्हिपला कोणताही प्रतिसाद दिला नाही. हेच नाही तर ते बैठकीला अनुपस्थितीत राहिले. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटासोबत अनेक वर्षांपासून एकनिष्ठ आहेत. मात्र, त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून थेट एकनाथ शिंदे यांचा हात पकडला आहे. ओमराजे निंबाळकर यांचा हा निर्णय अनेकांना अजिबात आवडला नाही. अनेकांनी थेट सोशल मीडियावर त्यांना अनफॉलो करण्यास सुरूवात केली. यादरम्यानच आता पक्षांतराच्या मुद्द्यात पहिली मोठी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली. ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय भूमिका 20 जूनला जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरीनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हटले की, राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होत. शिवाय विकासनिधीचा अभाव, यासारखी कारणे आहेतच. मी मोठ्या धर्म संकटात आहे. निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य आहे. भावनिक विचार केला तर चुकीचे वाटते. पण राजकीयदृष्टीने बघितले तर तेच योग्य वाटते.

माझ्याकडे निष्ठा तर समोरच्यांकडे सत्ता आहे. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नव्हती. पक्षांतरासाठी पैसे घेतल्याचा, वाय प्लस सुरक्षा दिल्याच्या चर्चा खोट्या आहेत. हा निर्णय केवळ मतदारांच्या विकासासी घेतला आहे. आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणे शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं, असेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

खासदार ओमराजे निंबाळकरबद्दल आमदार कैलास पाटील भावनिक झाले. त्यांनी म्हटले की, खासदार ओमराजेंना सोडून पहिलाच शिवसेनेचा वर्धापन दिन. प्रत्येक वर्षी आम्ही दोघेजण वर्धापन दिनासाठी बरोबर जात होतो. मात्र, ते आज माझ्याबरोबर नाहीत हे माझ्यासाठी वेदनादायी आहे. माझी अपेक्षा आहे की, पहिल्याप्रमाणे शिवसेना एकसंघ राहावी.  मिळून काम केल्यानंतर एखादा मित्र जर बरोबर नसेल तर वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.