मागच्या दोन दशकांपासून नारायणे राणे आणि उद्धव ठाकरे हे परस्परांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. 2004 साली नारायण राणे फुटून शिवसेनेतून बाहेर पडले, त्यानंतर हा राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला. नारायण राणे यांनी नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे. सध्या शिवसेनेत जी फूट पडलीय ते चौथं बंड आहे. 1991 साली आधी छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर नारायण राणे. या दोन्ही बंडातून शिवसेना सावरली. पुन्हा उभी राहिली. पण 2022 आणि आता खासदार फुटीनंतर मात्र ठाकरेंची घसरणच सुरुच आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले त्यावर राणे कुटुंबातून निलेश राणे बोलले आहेत.
“ज्यांनी कमावलेलं असतं, त्याला वाईट वाटतं. त्याला वाटतं लोकांना जवळ करावं, परत बोलवावं. पण यांनी स्वत: काहीच कमावलेलं नाही. यांना असचं वाटणार लोकांनी जावं. मी एकटा कंट्रोलमध्ये राहणार. संजय राऊतने शिवसेना कुठल्या गल्लीत उभी केली?. नगरसेवक म्हणून कधी शिवसेनेच्या बाजूने बोलले. विधिमंडळात भाषण केलं. यांना आयती राज्यसभा मिळते. तिथे पसरुन बसलेत” अशा शब्दात निलेश राणेयांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला.
फक्त संजय राऊत राहिला पाहिजे
“मूळात संघटनेसाठी संघर्ष करावा लागतो. शिवसेना हे संघर्षाच दुसरं नाव आहे. जेव्हा शिवसेना वाढत होती, तेव्हा संजय राऊत कुठे होते?” असा सवाल निलेश राणे यांनी विचारला. “त्यांना काही फरक पडत नाही, शिवसेना राहिली काय, उद्धव साहेब राहिली काय, फक्त संजय राऊत राहिला पाहिजे” असं निलेश राणे म्हणाले.
संजय राऊत ही उद्धव ठाकरे गटाला लागलेली कीड
“ही काय भाषा झाली. राज्यसभेवर ही त्यांची दुसरी-तिसरी टर्म आहे. जनतेतून ते तर निवडून येत नाहीत. काय साध्य करायचय तुम्हाला, उद्धव साहेबांना मदत होईल की नुकसान होईल याचा उद्धव साहेबांनी विचार करावा. शिव्या सगळेच घालतात पण कुठे घालायच्या. एकदा चॅनलवर थुंकलेला हा माणूस. संजय राऊत ही उद्धव ठाकरे गटाला लागलेली कीड आहे. संजय राऊतला जो पर्यंत उद्धव ठाकरे बाजूला करत नाहीत, तो पर्यंत हे नुकसान वाढत जाणार, टोकाला जाणार. संजय राऊतांच्या भाषेमुळे उद्धवसाहेबांचं नुकसान होतय की फायदा याचा त्यांनी विचार करावा” असं निलेश राणे म्हणाले.