Nitin Chandanshive: आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा. समोर कितीही मोठी यंत्रणा, पैसा किंवा सत्ता असली तरी घाबरू नका. हा महाराष्ट्र आणि हा सामान्य शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही जी मेहनत घेताय, जो संघर्ष करताय तो वाया जाणार नाही. आता मागे हटायचं नाही, मैदानात उतरून या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहन दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात केले. शिवसैनिकांनी या 60 वर्षात खूप काही पाहिलं आहे. दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्या आहेत. हृदयाला घाव घातले गेले, टाके उठले गेले, शिवत राहिले, शिवसेना फाटली नाही, तुटली नाही, ती जिद्दीने उभीच राहिली आणि उभी राहणारच असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
नितीन चंदनशिवे यांनी भाषणाची सुरुवात भावनिक केली. ते म्हणाले, मी आलोय, मी एक एक नाही अनेक हुंदके घेऊन आलोय, मी आलोय महाराष्ट्रातल्या मराठी मातीचा हुंदका घेऊन, मी आलोय प्रत्येक मराठी मनाचा एक हुंदका घेऊन, मी धाराशीवच्या मातीचा हंबरडा घेऊन आलोय आणि गावगाड्यावरती पारावरती बसणाऱ्या म्हाताऱ्यांपासून ते नुकत्याच जन्माला आलेल्या पोरांच्या छातीच्या आत असलेल्या हृदयातल्या ठोक्याचा हुंदका घेऊन आलोय.
छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नाव घेऊन राजकारण करत आहेत. किती उंचीचा पुतळा? यावर तुमचं प्रेम. पुतळ्यात महाराजांना बघायची सवय लागली, हीच घसरण आपल्या शहाणपणाची झाली आहे. ही पुन्हा भरून काढली पाहिजे. जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. माणसं जोडा, शिवसैनिक, भीम सैनिक, मनसैनिक, मराठी सैनिक ही सगळी एकत्रित या. या मातीला गरज आहे स्वाभिमानाची. बाळासाहेब ठाकरे आज देहाने नसले तरी मनगटात तो विचार आहे ना? तो स्वाभिमान जिवंत ठेवा, मला दिसतंय, लवकरच तुम्ही पुन्हा सत्तेत आहात, असे ते म्हणाले.
नितीन चंदनशिवे म्हणाले की, शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी कधीच झाला नव्हता. शिवसेनेचा जन्म इथल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला होता. त्यामुळं कोण गेलं, कोण आलं यानं शिवसेना कधी संपली नाही आणि ती कधी संपणारी नाही. तुम्ही मराठी माणसासाठी लढलात, तुमच्या प्रामाणिकपणाला महाराष्ट्राने जवळ केलं आणि मग या माय मराठीने ही सत्ता तुमच्या पदरात दिली, याचा विसर पडल्यामुळे बरीच गणितं हल्लीत असं मला वाटतं.
नितीन चंदनशिवे म्हणाले, रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्यांना होता येतं, त्यांनाच निष्ठा कळत असते. आणि त्यांनाच चवदार तळ्याचं पाणी समजत असतं, आणि त्यांनाच भिडेवाड्यातल्या वर्गातल्या सावित्रीने फळ्यावर गिरवलेल्या पहिल्या अक्षरांचा अर्थ हे त्या निष्ठावंतांनाच कळत असतं. ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा काळ आठवला मी. तर आमची आजी टीव्ही बघत असायची. टीव्हीत फक्त उद्धव साहेबांनाच बघायची. कारण काय माहिती आहे? माझ्या आजीला टीव्हीत दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेकासारखा वाटला. माझ्या आईला संकट काळात सख्ख्या भावापेक्षा जवळचा भाऊ वाटला आणि आम्हा सगळ्यांना हा मुख्यमंत्री मामासारखा वाटला. लोकांनी सांगितलं की मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत. अरे, पण तो माणूस घरात बसून अख्ख्या महाराष्ट्रातल्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख म्हणून काळजी घेत होता, हे या कृतघ्न लोकांना कसं समजणार?
इतर महत्वाच्या बातम्या