एमआयडीसीकडून २४ तास पाणीपुरवठा बंद
नवी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदरला पाणीटंचाईची झळ
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. एमआयडीसीने जाहीर केलेल्या या नियोजित शटडाऊनमुळे नवी मुंबई पालकेसह ठाणे, मिरा-भाईंदर पालिका, टीटीसी औद्योगिक क्षेत्र आणि वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रातील लाखो नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
एमआयडीसीने दिलेल्या माहितीनुसार, एल निनो आणि आयओडी (इंडियन ओशन डायपोल) यांच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्याने यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागासोबत झालेल्या आढावा बैठकीत पाणी कपातीचे नियोजन केले आहे.
यापूर्वी बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा ४८ तास बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु, मोहरम सणामुळे ४८ तासांऐवजी २४ तासांच्या कपातीचा निर्णय घेतला आहे.
वेळापत्रकात बदल
१ शुक्रवारी (ता. २६) मोहरमचा सण असल्याने या आठवड्यातील पाणीकपातीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार, बुधवारी (ता. २४) रात्री १२ वाजल्यापासून ते गुरुवारी (ता. २५) रात्री १२ वाजेपर्यंत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. म्हणजेच एकूण २४ तासांचा शटडाऊन राहील.
२ या कालावधीत नवी मुंबईसह ठाणे आणि मिरा-भाईंदर पालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होणार असून, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर काही तास कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता एमआयडीसीने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन केले आहे.