Rohit Sharma Padma Shri Award : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma ) आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात रोहि शर्माला देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. रोहित शर्माला हा सन्मान मे महिन्यातच मिळणार होता, परंतु क्रिकेटसंबंधित कारणांमुळे रोहित शर्मा उपस्थित राहू शकला नाही.
दरम्यान, आजचा दिवस हा रोहित शर्मासाठी विशेष आहे. कारण 23 जून 2007 रोजी त्याने आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. एकोणीस वर्षांनंतर, त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रोहित शर्माला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
आजच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. रोहित शर्मा काळ्या रंगाचा सूट घालून आला आणि पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी त्याने राष्ट्रपतींसमोर हात जोडले. 2026 मध्ये पद्मश्रीने सन्मानित होणारा रोहित शर्मा हा एकमेव क्रिकेटपटू नाही. यापूर्वी मे महिन्यात, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2025 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
रोहित शर्माने आपल्या शानदार कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याने टीम इंडियासाठी 510 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 19 वर्षांच्या प्रवासात, त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 20173 धावा आणि 50 शतके झळकावली आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक 653 षटकार मारले आहेत.एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तीन द्विशतके झळकावणारा रोहित शर्मा हा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे.
A highly prestigious honour for a great of the game 🙌
— BCCI (@BCCI) June 23, 2026
President of India, Smt Droupadi Murmuji @rashtrapatibhvn confers former #TeamIndia captain Rohit Sharma @ImRo45 with the Padma Shri award 👏
pic.twitter.com/6EyffHr1A4
रोहित शर्माने पुरस्कार स्वीकारल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्याचं अभिनंदन करण्यात आलं आहे. क्रिकेटमधील एका महान खेळाडूसाठी हा अत्यंत प्रतिष्ठित सन्मान असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हटलं आहे.