Bachchu Kadu: शेतकरी कर्जमाफीवरून विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदारांमध्येच चांगलीच जुंपली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यामध्ये शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. काल या दोन्ही आमदारांमध्ये खडाजंगी झाली होती, त्यामुळे सभागृहामध्ये सुद्धा काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधान परिषदेमध्ये चर्चा सुरू असतानाच बच्चू कडू यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सरकारकडून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उत्तर दिलं. उत्तर देत असतानाच बच्चू कडू यांनी पुन्हा प्रतिप्रश्न केला. यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हस्तक्षेप करत बच्चू कडू यांच्यावर चांगलाच राग काढला. "मी तुमच्यापेक्षा 10 पटीने जास्त ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही," अशा शब्दांत प्रवीण दरेकरांनी बच्चू कडू यांना सुनावलं. आता बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बच्चू कडू यांनी त्या संदर्भात बोलताना सांगितलं की, "मी शेतकऱ्यांची बाजू मांडत होतो, त्यामुळे कर्जमाफीच्या ज्या उणिवा आहेत, त्या संदर्भाने सहकार मंत्र्यांना प्रश्न विचारत होतो." मात्र प्रवीण दरेकर म्हणाले की, "मी सभागृहाची शिस्त मोडतो." मला असं वाटतं की आमच्यामध्ये कुठल्याही खडाजंगीचा विषय नाही. शेतकऱ्यांचा विषय मोठा असावा, कुठल्याही खडाजंगीचा विषय मोठा करू नये, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. "शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणजे विरोधी झालो का? असं होत नाही," असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. "कर्जमाफीवरून प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्याचे त्यावर उत्तर शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत, नाहीतर सरकार बदनाम होत आहे," असंही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री बाबासाहेब पाटील हे सभागृहात बोलत होते. ते म्हणाले की, “राज्य सरकारने कर्जमाफी कोणत्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेली नाही. किंवा कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिलेली नाही. पुढील काही वर्ष कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत. असं असतानाही सरकारने कर्जमाफी केली”, असं मंत्री बाबासाहेब पाटील सभागृहात बोलत होते. मात्र, तितक्यात आमदार बच्चू कडू यांनी प्रश्न विचारले. कडू म्हणाले की, “माझं मत असं आहे की आम्ही जेव्हा काही प्रश्न मांडलेत किंवा काही सूचना केल्या आहेत, त्याबाबत उत्तरे मिळाली पाहिजेत. आमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडून मिळणार नाहीत असं दिसतंय”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
इतर महत्वाच्या बातम्या