Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने पोस्ट केली दुसरी जन्म तारीख, असं का ते जाणून घ्या
GH News June 25, 2026 08:12 PM

भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात ही मालिका खेळणार आहे. या मालिकेतून श्रेयस अय्यर पहिल्यांदाच कर्णधारपदाची भूमिका बजावणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरने इंस्टाग्राम प्रोफाईलवर दुसरी जन्म तारीख टाकली आहे. श्रेयस अय्यरने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिलं की, Second DOB: 25.12.2025. आता प्रश्न असा की त्याने असं का लिहिलं? श्रेयस अय्यरच्या दुसऱ्या जन्मतारखेचा नेमका अर्थ काय? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात..

श्रेयस अय्यरने दुसरी जन्म तारीख लिहिण्याचं कारण काय?

श्रेयस अय्यरने इंस्टाग्राम बायोमध्ये दुसरी जन्मतारीख का लिहिली? याचं अधिकृत कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही. पण 25 डिसेंबर 2025 ही श्रेयस अय्यरच्या क्रिकेट कारकिर्दीतील खूप महत्त्वाची तारीख मानली जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गंभीर दुखापत झाल्यानंतर दोन महिने मैदानापासून दूर होता. त्यानंतर 25 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा सराव सुरू केला होता. या बायोतील बदलानंतर एका चाहत्याने लिहिलं की, ‘25.12-2025 हा तो दिवस होता जेव्हा श्रेयस अय्यरने जीवघेण्या दुखापतीवर मात केली आणि पुन्हा बॅट हातात घेतली. हा त्याच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आहे. कदाचित म्हणूनच 25 हा आकडा त्याच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. त्या अपघातानंतर श्रेयस अय्यर अधिक आध्यात्मिक झाला आहे.”

श्रेयस अय्यरची नवी सुरूवात

श्रेयस अय्यरची एक खेळाडू म्हणून नवी सुरूवात होणार आहे. कारण आता त्याच्या खांद्यावर टी20 संघाची धुरा सोपवली गेली आहे. त्यामुळे आयर्लंड दौऱ्यात त्याच्या नेतृत्वाची परीक्षा होणार आहे. सूर्यकुमार यादवनंतर श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवलं गेलं आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकली होती. पण त्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय होता. त्यामुळे त्याच्याकडून कर्णधारपद काढून श्रेयस अय्यरकडे धुरा सोपवली आहे. श्रेयस अय्यरने आयपीएल स्पर्धेत आपले नेतृत्व गुण सिद्ध केले आहेत. त्याच्या नेतृत्वात केकेआरने आयपीएल जेतेपद मिळवलं. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं. कर्णधारपदाचा दबाव असून अय्यरने चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर विश्वास टाकला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.