दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या अत्यंत भीषण अपघात झाला. गुरूवारी सकाळी एका कारची ट्रकला जोरदार धडक बसून हादरवणारा अपघात झाला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील चौघांचा मत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झालेत. मृत्युमखी पडलेले चौघजण हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून ते व्यावसायिक होते. मोबाईल ॲक्सेसरीज आणण्यासाठी हे चौघेही दिल्लीला जात होते . मात्र त्याचदरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रवींद्र भागवत काळे (वय 28), संदीप नवनाथ बोरसे ( वय 30 ), सचिन गंगाधर गजभारे ( वय 37 ) आणि राजेंद्र भावराव कवडे (वय 46 ) अशी मृतांची नावं आहेत. तर अब्दुल खलील अब्दुल समद ( वय 30) आणि उमर इस्माईल जहागीरदार (वय 32) हे गंभीर जखमी झाले आहेत.
नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक रवींद्र काळे यांच्या MH 20 GE 7359 क्रमांकाच्या 7-सीटर कारमधून हे सहाही जण बुधवारी रात्री सुमारे 12 वाजता दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. गुरुवारी सकाळी मंदसौर जिल्ह्यातील तितरोद शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरील अवजड ट्रकला पाठीमागून प्रचंड वेगाने धडक दिली. मात्र हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा पुढील भाग अक्षरशः बोनेटपासून पुढील सीटपर्यंत चेंगरला. अपघातानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कारमालक रवींद्र काळे यांच्या मोबाईलवरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक तातडीने मंदसौरकडे रवाना झाले. या दुर्दैवी घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाशिमजवळ खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात
दरम्यान वाशिमजवळ खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले…दुभाजक ओलांडून बस थेट टिन पत्राच्या दुकानांमध्ये घुसली. चिकन, मटण व पानपट्टीची 3 ते 4 टिन पत्राची दुकाने चिरडली. या दुकानात पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान कोणी उपस्थित नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या ट्रॅव्हल्स अपघातात चालकासह तीन ते चार प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.