भारत आणि इंग्लंड टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने आले होते. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न होता. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 190 धावा केल्या. तसेच विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडन 4 गडी राखून हे आव्हान पूर्ण केलं. यासह पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात हा तिसरा पराभव आहे.
भारताने विजयासाठी दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात निराशाजनक झाली. पहिल्या षटकात इंग्लंडला दोन धक्के बसले. फिलिप सॉल्ट आणि जोस बटलर खातं न खोलता बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल यांनी 50 धावांची भागीदारी केली. हॅरी ब्रूक 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर टॉम बँटन आणि जेकब बेथेल यांची भागीदारी जमली. पण 39 धावांवर टॉम बँटन बाद झाला. विल जॅक्सही 9 धावांवर असताना बाद झाला. एका बाजूने जेकब बेथेल विजयासाठी झुंज देत होता. त्याची अर्धशतकी खेळी निर्णायक ठरली. जेकेब बेथेलने रवि बिष्णोईच्या षटकात पुरेपूर लाभ घेतला. नो बॉलनंतर सॅम करनने एक धाव घेतली आणि बेथेलला स्ट्राईक मिळाली. त्यानंतर त्याने बिष्णोईची धुलाई करत त्यात आणखी 27 धावा जोडल्या आणि एका षटकात 29 धावा आल्या. त्यामुळे सामना फिरला.
भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. वैभव 14 दावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्यातील भागीदारी फक्त 15 धावांची झाली अभिषेक शर्मा 43 धावांवर बाद झाला. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांची जोडी जमली. यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 65 धावा केल्या. श्रेयस अय्यर 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे काही खास करू शकला नाही. फक्त 5 धावा करून परतला. इशान किशनचं अर्धशतक फक्त एका धावेने हुकलं. तर अक्षर पटेल 2 धावांवर असताना धावचीत झाला. हार्षित राणाही 6 धावांवर बाद झाला. तिलक वर्मा नाबाद 24 धावांवर राहिला.