मुंबई : काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर (Sahin Ahir) यांनी उद्धव ठाकरे साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांना तातडीने महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. आता ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये त्यांच्या भावना, आलेली ऑफर आणि इतर गोष्टींवरती सखोल भाष्य केलं आहे, यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन अहिर (Sahin Ahir) यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना थेट 'विधानपरिषद उपसभापती' पदाचा प्रस्ताव (ऑफर) आला होता. हा प्रस्ताव आल्यानंतरच पुढील राजकीय निर्णय किंवा चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले. (Sahin Ahir)
खासदारांच्या पक्षबदलाच्या वेळी त्यांच्या पक्षप्रवेशाची कसलीही चर्चा नव्हती, जेव्हा इतर खासदारांच्या संदर्भात राजकीय घडामोडी घडत होत्या, तेव्हा या विषयावर आपली कोणतीही चर्चा झाली नव्हती, कारण तो विषय आपल्याशी संबंधित नव्हत. इतर नेत्यांच्या सर्व घडामोडी झाल्यानंतरच हा प्रस्ताव आणि चर्चा समोर आली. सचिन अहिर यांनी ठामपणे सांगितले की, त्यांनी मूळ पक्ष सोडलेला नाही, ते आणि सुनील शिंदे हे दोघेच असे आमदार राहिले आहेत जे 'धनुष्यबाण' या चिन्हावर निवडून आलेले आहेत. (Sahin Ahir)
शिंदेंनी उपसभापती पदाचीच ऑफर दिली का? यावर सचिन अहिर म्हणाले, "स्वाभाविक आहे ना! तो प्रस्ताव माझ्याकडे आला म्हणूनच पुढे चर्चा झाली. पण जेव्हा हे सगळं इतर खासदारांच्या बाबतीत घडत होतं, त्यावेळेला याविषयी अजिबात चर्चा नव्हती किंवा तो विषयच नव्हता; कारण त्या घडामोडींशी माझा काही संबंध नव्हता. संजय यांच्या संदर्भातील सर्व विषय झाल्यानंतरची ही चर्चा आहे. दुसरा मुख्य भाग असा की, ही जी निवडणूक होते ती कोणत्याही सदस्यासाठी असू शकते. कालांतराने एक काळ असा होता की हे पद विरोधी पक्षाला दिलं जायचं. अर्थात, आता फरक असा आहे की, मी पक्ष सोडलेला नाही, मी आहे त्याच पक्षात आहे. कारण मी आणि सुनील शिंदे हे दोघेच असे आमदार राहिलेलो आहोत, जे 'धनुष्यबाण' चिन्हावर निवडून आले होते." (Sahin Ahir)
यावर मुलाखतकार सरिता कौशिक यांनी विचारले की, 'आम्ही ऐकत होतो की सुनील शिंदे तुमच्या आधी (शिंदे गटात) येणार होते, पण तुम्हीच पहिले आलात?' यावर सचिन अहिर म्हणाले, "हे तुम्ही मला सांगताय, मला माहित नाही. तुम्ही नवीन बातमी फोडत आहात, मी त्यावर कोणतीही कमेंट करणार नाही. नाहीतर परत असं होईल की, 'हेच काहीतरी बोलतात.' तो त्यांचा अंतर्गत भाग आहे. वरळीच्या मतदारांना चांगलं माहीत आहे की महानगरपालिकेत त्यांच्यासोबत कोण होतं. आम्ही ताकतीने मुस्लिम समाज, मागासवर्गीय समाज आणि इतर पारंपरिक मतदार जो आमच्या पाठीशी राहिलेला आहे, त्यांची मतं वळवण्याचं काम केलं. तुम्ही विचार करा की, मिलिंद देवरांसारखे लोकसभेचे उमेदवार असताना, ज्यांचा विधानसभेत रोजचा संपर्क नव्हता, तरीही आम्ही दोन दोन आमदार असताना एवढी पिछाडी का झाली? या गोष्टी आपण नाकारू शकत नाही. याचा अर्थच असा आहे की, मूळ जो शिवसेनेचा मतदार आहे तो हललेला आहे असंही पुढे सचिन आहेर म्हणालेत.
राजकारणात मतं डायव्हर्ट होतात, त्यावेळीही ते झालं होतं. कारण तेव्हा 'मनसे' देखील होती आणि महानगरपालिकेत मनसे सोबत असल्यामुळे त्या जागा आल्या होत्या. पण तुम्ही जर आता शिंदे साहेबांच्या पक्षाची मतं बघितली, तर दोन दिवस आधी प्रचार करायला आलेल्या माणसालाही आठ हजार मतं पडली होती. म्हणूनच मी नेहमी सांगतो की वरळी हा अत्यंत संवेदनशील (Vital) मतदारसंघ आहे. काही जण याला 'बालेकिल्ला' म्हणतात. पण जर तो बालेकिल्ला होता, तर पूर्वी शिवडी मतदारसंघाचा जेव्हा वरळी झाला, तेव्हा मी वरळीतूनच आमदार म्हणून निवडून आलो ना? तेव्हा मी मंत्री झालो, सर्व काही झालं. त्यामुळे हा मतदारसंघ 'व्हायटल' आहे, तो कधीही अनपेक्षित निकाल देऊ शकतो. जर कोणाला असं वाटत असेल की वरळीवर आता आमचा 'सातबारा' आहे, तर तसं अजिबात नाही. तो सातबारा माझाही नाही आणि कोणाचाही होऊ शकत नाही. वरळीचे भवितव्य वरळीकरच ठरवतील. वरळीकरांनी माझंही काम बघितलं आहे आणि इतर लोकप्रतिनिधींचंही काम बघितलेलं आहे," असं पुढे सचिन अहिर म्हणाले.