राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. राज्याचे मंत्री, आमदार आणि खासदारही नागरिकांच्या संपर्कात आहेत. तसेच जोर बैठकाही सुरू आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा फिल्डवर आहेत. त्यांनी तर मी तीन चार दिवसात तीन तासही झोपलो नाही, असं विधान केलं आहे. यावरून राज्यातील परिस्थिती काय आहे हे लक्षात येतं.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी इगतपुरी येथे भेट देऊन महामार्ग आणि शहरातील भागात पाहणी केली. तसेच अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. उद्या घोटी, त्र्यंबक, इगतपुरी, पेठ सुरगाणा या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. 1 वाजेपासून सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत ढगफुटीचा वेग राहील. यावेळी 300 मिली पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शासनाच्या वतीने आम्ही सगळी काळजी घेत आहोत, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
नागरिकांचं स्थलांतरनदी, नाल्या काठी भूस्खलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी-नाल्याकाठच्या लोकांना सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. सगळ्या यंत्रणा सज्ज आहेत. सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. सगळे आमचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी थांबलेले आहेत. पाणी एवढा झाला आता अंदाज खरा ठरला तर विक्रमी पाऊस होणार आहे, असं महाजन म्हणाले.
आपला जीव महत्त्वाचा…आम्ही जेसीबी लावून नाले मोठे करत आहोत. जेणेकरून पुढे त्रास व्हायला नको म्हणून रात्रीचं सुद्धा काम चाललं आहे. उद्या आम्ही शाळा, कॉलेज, बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. विनाकारण कोणी बाहेर फिरू नये, कारण उद्याचा दिवस महत्वाचा आहे. कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचा विक्रम होणार आहे. शासन प्रशासन आपली काळजी घेतंय. आपला जीवही महत्वाचा आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. पर्यटनाला जाऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.
12 वाजेनंतर बाहेर पडता येणार नाहीत्र्यंबकेश्वर, वणीला दर्शनाला जात असाल तर जाऊ नका. कारण सगळे देवस्थान बंद ठेवण्यात आले आहेत. तशा सूचना देण्यात आल्या आहेत. हॉटेलमध्ये अनेक पर्यटक आहेत. महिला आहेत. आम्ही त्यांना आतच रवाना केले आहे. इथे थांबू नका 12 वाजेनंतर आपणास बाहेर जाता येणार नाही, अशी विनंती केली आहे. लोकांनी आम्हाला सहकार्य कराव एवढी विनंती आहे, असं ते म्हणाले.
कुठलीही रिस्क घ्यायची नाहीइथून मी त्र्यंबकेश्वर येथे जाणार आहे. मी घोटीलाही होतो. सगळ्यांशी आम्ही चर्चा करत आहोत. कामाची पाहणी करत आहोत. जे जे करण्यासारखं आहे, आम्ही करतोय. आम्हाला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. इतक्या कमी वेळात इतका पाऊस पडण्याची अशी वेळ कधी आली नाही. रायगड, पालघर, वसई, विरार मुंबई सगळीकडे विक्रमी पाऊस पडला आहे. जो पाऊस महिन्याभरात पडत नाही तो चार दिवसात पडत आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा निसर्गाचा कोप किंवा आपत्ती म्हणावी लागेल. त्याला आम्ही समोर जातोय. तीन चार दिवसात मी तीन तासही झोपलो नाहीये. बैठका घेतोय, फिरतोय आमचे सगळे अधिकारी कर्मचारी कामाला लागले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.