देवेंद्र फडणवीसांवर संजय राऊत मुंबई आणि पुणे (Mumbai and Pune) परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक दुर्घटना घडल्या. यातच मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या एक्सप्रेसवेवरील नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’चा काही पावसात कोसळल्याने खळबळ उडाली आहे. यावरून राज्याचे राजकारण तापले असून, विरोधी पक्षांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टार्गेट केले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर घणाघाती हल्ला केलाय.
संजय राऊत म्हणाले की, “दोन लोकांचं बिंग या देशात फुटलेलं आहे. एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि दुसरे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस. एक खड्डा पडला आहे, दोन खड्डे पडले आहेत. 6700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले. कमिशन दलाली मिळाली ती वाहून गेली नाही. त्यातून भाजपला निधी मिळाला. पण सरकारचे पैसे वाहून गेले.”
पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, “ज्या ज्या गोष्टी इन्फ्रा मॅनने सांगितल्या त्याचा बोजवारा उडाला. आपण गेल्या काही वर्षांत पाहिलं, ज्या पद्धतीने मुंबई, ठाणे ही मोठी शहरे आज भाजपच्या ताब्यात गेली, पावसामध्ये याची वाताहत झाली. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, कोसळून गेलं. या लोकांनी ठेकेदारांकडून फक्त पैसे, दलाली घेतली हे या चार दिवसांतल्या पावसाने उघड केलं आहे, अशी टीका त्यांनी केली.
संजय राऊत यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या (Nashik Kumbh Mela) नियोजनावर आणि मंत्र्यांवरही जोरदार प्रहार केला. “भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात आणि महानगरपालिकेमध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त ओरबाडणं सुरू आहे. आता लोकांना नाशिकच्या कुंभमेळ्याची भीती वाटत आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी कोणावर आहे? ‘इन्फ्रा’ यांच्या राईट हॅन्डवर, जे या महाराष्ट्रातले सगळ्यात भ्रष्ट मंत्री आहेत. संकटमोचक कसले? संकटलोचन आहेत, त्यांनी डोळा उघडला की संकट दिसतं. आता कुंभमेळ्यामध्ये काय होईल? कुंभमेळ्यात किती भ्रष्टाचार होईल? त्या भ्रष्टाचारातून कोणती संकटे निर्माण होतील? लाखो लोक तिकडे येतील, भाविक, श्रद्धाळू, संत… आणि सगळे ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिले, त्याच्यामुळे अजिबात काम होणार नाही, फक्त यांना कमिशन मिळेल. हे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
मिसिंग लिंकच्या कामावर बोट ठेवत ते म्हणाले, “ज्या पद्धतीने मिसिंग लिंक कोसळताना जगाने पाहिलं, याचं काम सगळं जागतिक स्तरावर असतं, 6 देशांनी त्याच्यात सहभाग घेतला असं आपले इन्फ्रामॅन म्हणत होते. 6 देश, 6 प्रमुख देश… त्यात कॅनडाचे नाव सुद्धा त्यांनी घेतले. त्यांच्या सहकार्यातून जो मिसिंग लिंक तयार झाला आणि त्या मिसिंग लिंकवरून स्वतः इन्फ्रा मॅन आणि डेप्युटी इन्फ्रा मॅन स्वतः वाहन चालवत फिरत होते. पण काय झालं? कोसळताना आम्ही पाहिलं आहे. महाराष्ट्राची गेल्या काही वर्षांची जी अप्रतिष्ठा आणि बेअब्रू झाली, त्याचं शेवटचं टोक म्हणजे मिसिंग लिंक कोसळणे आहे.”
संजय राऊत पुढे म्हणाले की, आता म्हणा, यांनी एक पूल तरी उभारला का? मुंबईमध्ये 56 पूल आम्ही उभारले, ते काल म्हणत होते ज्यांनी एका पुलाचे उभारणी केली नाही ते आम्हाला शिकवतात. महाशय, महाराष्ट्रात शिवसेना-भाजप सरकार असताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेपासून ते 56 पूल, विदर्भातले सर्व रस्ते त्याच काळात झाले. तेव्हा आपण मंत्री नव्हता, आमदार होतात फार तर. त्याच्यामुळे तुम्ही विकास काय असतो ते आम्हाला सांगू नका, असा घणाघात देखील त्यांनी केलाय.
आणखी वाचा