नीट-युजी परीक्षा संगणकावर, 1 हजार परीक्षा केंद्रे
वृत्तसंस्था
वैद्यकीय पदवी मिळविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ‘नीट-युजी’ प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये पुढच्या वर्षीपासून मोठे परिवर्तन केले जाणार आहे. 2027 पासून ही परीक्षा संगणकावर घेतली जाणार असून 1 हजार केंद्रांची सोय त्यासाठी केली जाणार आहे. देशातील 500 हून अधिक शहरांमध्ये ही केंद्रे असतील. तसेच ही परीक्षा पाच ते सहा दिवस चालणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रे सरकारी शिक्षण संस्थांच्या इमारतींमध्ये घेण्याची योजना आहे. केंद्रीय विद्यालयांच्या इमारती यासाठी उपयोगात आणल्या जाणार आहेत. एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यापेक्षा, प्रतिदिन 5 ते 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. अशा प्रकारे पाच ते सहा दिवस परीक्षा होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
प्रश्नपत्रिकांचे काय…
परीक्षा एकाच दिवशी न घेता ती पाच-सहा दिवस घेतल्यास प्रश्नपत्रिका प्रत्येक दिवशी भिन्न असावी लागणार आहे. या सर्व प्रश्नपत्रिकांची ‘काठीण्य पातळी’ (डिफिकल्टी लेव्हल) समान असावी लागणार आहे, अशाही सूचना काही तज्ञांनी केल्या आहेत. तसेच, संगणकीय नेटवर्क सुयोग्य पद्धतीने कार्यरत ठेवावे लागणार आहे. प्रश्नप्रत्रिका फुटल्याने या वर्षी नीट परीक्षा पुन्हा एकदा घ्यावी लागली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठया मनस्तापाला तोंड द्यावे लागले होते. अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी एक ‘वॉटरटाईट’ व्यवस्था स्थापन केली जाणार आहे.
एनटीएमध्ये होणार अमूलाग्र परिवर्तन
ही आणि अशा प्रकारच्या प्रवेश परीक्षा घेणाऱ्या ‘राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणा’च्या (एनटीए) रचनेत आणि कार्यपद्धतीत अमूलाग्र परिवर्तन केले जाण्याची योजना आहे. प्राधिकारणाच्या कामाची पारदर्शिता वाढावी यासाठी रचना नवी केली जाणार आहे. तसेच अनेक नियमही नवे केले जाणार आहेत. येत्या ऑक्टोबरपर्यंत हे रचना परिवर्तननाचे काम पूर्ण केले जाईल आणि प्राधिकरण पुढची परीक्षा योग्य रितेने आणि त्रुटीहीन पद्धतीने घेण्यासाठी सज्ज असेल, असे स्पष्ट केले गेले आहे.
20 वर्षांमध्ये 45 प्रकरणे
गेल्या 20 वर्षांमध्ये मोठ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटीची 45 प्रकरणे घडली आहेत. एका वृत्तसंस्थेने या संबंधीचे सर्वेक्षण केले आहे. ज्या परीक्षेला किमान 1 लाख किंवा अधिक विद्यार्थी उपस्थित राहतात, अशा परीक्षांचा या सर्वेक्षणात समावेश आहे. मात्र, या 45 प्रकरणांपैकी केवळ 2 प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा झाली आहे, असेही या संस्थेला आढळले आहे. मे 2026 मध्ये झालेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआयडे सोपविण्यात आली आहे. सीबीआयने काही संशयितांना अटक केली आहे. हे प्रकरण कशा प्रकारे धसाला लागते, यासंबंधी सर्वांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.