महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा मोठा उलटफेर झाला आहे. राज्य सरकारने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनंतर विविध विभागातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर विविध विभाग आणि उपक्रमाची जबाबदारी सोपवली आहे. प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी बदल्या करण्यात आल्याचा सरकारचा उद्देश असल्याचे सांगण्यात आलं आहे.
कुणाची कुठे बदली?
पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रुपेश जयवंशी यांची मुंबईत स्थित असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर सामाजिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित महत्वपूर्ण कार्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीधर दुबे यांची नवी मुंबईत राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका अभियान, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ग्रामीण उपजीविका, महिला बचत गट आणि ग्रामीण विकास योजनांची व्यवस्थितरित्या अमंलबजावणी गती देण्यासाठी नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव पंकज देवरे यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली ही महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात सह महानगर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात त्यांच्यावर विविध प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी चर्चा आहे. जगदीश मिनियार हे छत्रपती संभाजीनगरातील सिडकोच्या मुख्य प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच वर्षा लड्डा यांची महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ.मंजिरी मनोलकर यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर निलेश सागर यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था , पुणे येथे आयुक्तपदी वर्णी लागली आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार 8 बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विविध विभागांत प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी बदल्यांचा आदेश काढला जातो. तसेच विकास योजनांची अंमलबजावणीचा देखील उद्देश असतो. हे फेरबदलांची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल, असं सामान्य प्रशासनाने स्पष्ट केलं.