मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला असून, भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने तब्बल १४ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात १२ ते १३ रिक्षांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंधेरी स्थानक (पश्चिम) ते मार्ग क्रमांक २४२ वरील बेस्ट बसचा चालक अचानक नियंत्रण गमावल्याने बसने रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. या भीषण धडकेत अनेक रिक्षांचे नुकसान झाले असून, काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, जखमींना उपचारासाठी तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी बेस्ट बस चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चालकाने बसचे ब्रेक निकामी (ब्रेक फेल) झाल्याचा दावा केला असून, या दाव्याची पडताळणी केली जात आहे.
या घटनेनंतर अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांत बेस्ट बसशी संबंधित अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.