तर मी आत्महत्या करेन.., डॉ. मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितला तो किस्सा!
Tv9 Marathi July 13, 2026 01:45 AM

Dr. Manmohan Singh : काँग्रेसचे दिवंगत नेते तथा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. त्यांनी या देशासाठी केलेलं काम त्यांच्या योजना यामुळे देशाने मोठी घोडदौड केली. लोकशाहीवर विश्वास असणारे हे काँग्रेसचे सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक होते. ते आज हयात नसले तरीही त्यांच्या आठवणी वेगवेगळ्या रुपात आजही तेवढ्यात ताज्या आहेत. दरम्यान,

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांचे ‘इंडिया अँड आय :अ हंड्रेड मेमोरीज, नॉट अ मेमॉयर’ नावाचे एक पुस्तक येत आहे. या पुस्तकात डॉ. मनमोहन सिंग यांची अशीच एक खास आठवण सांगण्यात आली आहे. उद्विग्न होऊन मनमोहन सिंग कुरेशी यांना …तर मी आत्महत्या करेन, असे म्हणाले होते. तेव्हा नेमकं काय घडलं होतं, याबाबत एस वाय कुरेशी यांनी आपल्या पुस्तकात सविस्तर सांगितलेलं आहे.

पुस्तक येण्याआधी कुरेशी यांनी त्या प्रसंगाबाबत सांगितलं आहे. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ते एक संविधानावर तसेच लोकशाहीवर विश्वास असणारे नेते होते, असं ते म्हणाले आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार हा प्रसंग 2012 सालचा आहे. तेव्हाचे कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी आमचा पक्ष सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिमांचे आरक्षण 4.5 टक्क्यांहून 9 टक्क्यांपर्यंत वाढवू आसे आश्वासन दिले होते. नंतर याच आश्वासनाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची निवडणूक आयुक्तांपुढे सुनावणी झाली. अभिषेक मनु सिंघवी यांनी काँग्रेसची बाजू मांडली तर अरुण जेटली यांनी भाजपाची बाजू मांडली. निवडणुकीचा प्रचार करताना काय बंधनं असावीत, याबाबतचा हा वाद होता, असं कुरेशी यांनी सांगितलं आहे.

तसेच, आमची कारवाई खुर्शिद यांना आवडली नाही. त्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक आयोगावर टीका केली जाऊ लागली. निवडणूक आयोग घमंडी आणि मनमानी कारभार करत आहे, असा दावा केला जाऊ लागला. मी हीच बाब नंतर हरीश खरे यांच्या कानावर घातली. खरे तेव्हा पंतप्रधानांचे प्रेस सेक्रेटरी होते. खरे यांनी माझ्या मनातील भावना पंतप्रधानांना सांगितल्या. मला अशा प्रकारच्या टीकेचे काही वाटत नाही. परंतु अशा टीकेमुळे एखाद्या संस्थेची विश्वासार्हता कमी होते. हीच बाब मला जास्त चिंताजनक वाटते, असे मी खरे यांना सांगितले, असं पुढे कुरेशी यांनी सांगितलं.

त्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मला कॉल केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी माझ्या नाराजीचा विषय काढला. तुम्ही जर असा विचार करत असाल तर मी आत्महत्या करेन. तुम्हाला असे काही वाटेल याची मला खरंच कल्पना नव्हता. मला याची कल्पना असती तर मी आमच्या नेत्यांना सांगितलं असतं. तुम्हाला काही तक्रार असेल तर मला फक्त फोन करा, असं मला डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते, अशी आठवण कुरेशी यांनी कुरेशी यांनी आवर्जून सांगितली. दरम्यान, आता कुरेशी यांच्या पुस्तकात नेमकं काय काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.