► वृत्तसंस्था दिब्रूगड
पँगसाऊ खिंडमार्गावर भारत आणि म्यानमारदरम्यान सीमा व्यापार पुन्हा सुरू होणार आहे. सुमारे 6 वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा व्यापार बंद होता. परंतु आता दोन्ही देशांच्या व्यापारी संघटनांच्या बैठकीनंतर 20 जुलैपासून हा व्यापार सुरू होईल.
मुक्त संचार व्यवस्थेच्या अंतर्गत सीमापार व्यापारामुळे दोन्ही बाजूच्या 10 किलोमीटरच्या कक्षेत राहणाऱ्या लोकांना व्यापार आणि सीमापार देवाणघेवाण करण्याची अनुमती मिळते.
कोरोना महामारीमुळे 3 फेब्रुवारी 2020 रोजी बंद करण्यात आलेला हा सीमापार व्यापारमार्ग पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय स्थानिक व्यापार प्रतिनिधी आणि म्यानमारमधील प्रतिनिधींदरम्यान 9 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशच्या चांगलांग जिल्ह्यात झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला आहे.
महामारीदरम्यान गमाविण्यात आलेली उपजीविका परत निर्माण होईल अशी अपेक्षा असल्याचे भारतातील स्थानिक व्यापार संघटनेचे अध्यक्ष जोंगखम मोरांग यांनी म्हटले आहे. सीमा व्यापार पुन्हा सुरू झाल्याने उत्तम व्यापारी संधी निर्माण होतील.
छोटे व्यापारी आणि रहिवाशांच्या उपजीविकेत सुधारणा होईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. बॉर्डर हाट दर महिन्याच्या 10, 20 आणि 30 तारखेला आयोजित होईल अशी माहिती स्थानिक आमदार लैसम सिमाई यांनी दिली आहे.
भारत-चीन सीमा व्यापाराचा हंगाम अधिकृतपणे सुरू होऊन एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटल्यावरही लिपुलेख खिंडीच्या माध्यमातून सीमापार व्यापार सुरू होऊ शकलेला नाही.
चिनी अधिकाऱ्यांनी भारतीय व्यापाऱ्यांना तिबेटच्या तकलाकोटमध्ये एक नवी बाजारपेठ आणि गोदाम निर्मिती पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे.
कोरोनामुळे 2020 साली लिपुलेखच्या माध्यमातून सीमाव्यापार स्थगित करण्यात आला होता आणि 6 वर्षांनी तो पुन्हा सुरू करण्यात आला होता.