टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने संघाची धुरा हाती घेतल्यापासून रडारवर आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गेल्या 2 वर्षांपासून संघाचं मुख्य प्रशिक्षकपद भूषवत आहे. या कालावधीत भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी20 वर्ल्डकप 2026 जिंकला. पण कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची स्थिती नाजूक आहे. तर वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या तयारीतही उणीवा दिसून येत आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याच्या दोन वर्षांच्या कालावधीला 10 पैकी 4 गुण दिले आहेत. मोहम्मद कैफने सांगितलं की, गंभीरमध्ये खेळाडूंशी संवाद साधण्याची कला नाही. मोहम्मद कैफने अप्रत्यक्षरित्या गंभीर आणि खेळाडूंमध्ये पारदर्शकता नसल्याचं सांगून गेला. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात संवाद होत नसल्याचंही कैफ बोलून गेला. कैफने गंभीर सल्ला देत सांगितलं की, खेळाडूंशी त्यांच्या रूममध्ये जाऊन बोलायला हवं.
मोहम्मद कैफ म्हणाला की, ‘मी गंभीरला 10 पैकी 4 गुण देईन. मी काही गुण कमी करेन. मला नुकतेच कळले आहे की विराट कोहली आणि गौतम गंभीर एकत्र दिसत नाहीत. गंभीर रोहित आणि गिलसोबत दिसतो, पण तो विराटसोबत दिसत नाही. ही एक उणीव आहे. जर एखाद्या खेळाडूला संघातून वगळले असेल, तो त्याच्या कामगिरीवर समाधानी नसेल, किंवा त्याला योग्य वागणूक मिळाली नसेल, तर पारदर्शकता राखणे हे प्रशिक्षकाचे काम आहे. खेळाडूंशी बोला. त्यांना का वगळण्यात आले हे समजावून सांगा.’
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला की, ‘जय-पराजय मैदानावरच ठरेल. खेळाडूंना वगळण्याचे कारण स्पष्ट केले पाहिजे. जर गंभीर आणि विराट सध्या एकत्र काम करत नसतील, तर ही चांगली बातमी नाही. जर ते एकत्र नसतील, तर ही भारतासाठी चांगली बातमी नाही. दक्षिण आफ्रिकेत 2027चा विश्वचषक जिंकणे सोपे नसेल. तुम्हाला सर्व खेळाडूंना एकत्र ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला वरिष्ठांशी समन्वय साधावा लागेल. मित्रा, खोलीत जाऊन बोल. हेच प्रशिक्षकाचे काम आहे.’
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी सराव शिबिरात गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सरावादरम्यान गंभीरने रोहित, गिल आणि केएल राहुलशी संवाद साधला. पण विराट कोहलीशी बोलला नाही. त्यामुळे संघात काही तरी घडतंय अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.