जंतर मंतरवरचे आंदोलन संपलेय. त्या अनुषंगाने देशात विविध दृष्टीकोनातून चर्चा सुरु झालीय. अनेकांची मते समोर येताहेत, त्यातच एका तरुणाने अख्ख्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे, त्याचे नाव आहे मोहम्मद इरफान! जंतर मंतरवर त्याने बर्फ विक्रीचा ठेला लावला होता! अंगात जुना टी-शर्ट, चुरगळलेली पॅन्ट आणि गळ्यात स्कार्फ घालून अगदी तळमळीने बोलणारा इरफान पेशाने एक हातगाडीवाला आहे मात्र त्याचा अभ्यास, त्याची प्रगल्भता, मांडणी आणि तळमळ विलक्षण आहे. इरफान दिल्लीतल्या झोपडपट्टीत राहतो.
दिल्लीच्या झगमगत्या रस्त्यांवरून वेगाने धावणाऱ्या मोटारींच्या काचांतून भारत वेगळा दिसतो; पण त्याच शहराच्या कडेने पसरलेल्या झोपडपट्ट्यांतून चालत गेल्यावर दुसराच भारत भेटतो. त्या भारतात पावसापासून संरक्षण देणारे छप्परही कायमस्वरूपी नसते, दिवसाची मजुरी उद्याच्या भाकरीची खात्री देत नाही आणि भविष्य हा शब्द अनेकदा शब्दकोशातच राहतो. अशाच एका झोपडपट्टीत, काही चौरस फुटांच्या कच्च्या घरात राहणारा मोहम्मद इरफान अचानक देशाच्या चर्चेत आलाय. त्याच्या हातात कोणतेही पद नाहीये, त्याच्यामागे कोणतीही संघटना नाही, त्याने कोणत्याही विद्यापीठाची पदवी मिळवलेली नाही. तरीही त्याचे बोलणे लाखो लोक ऐकताहेत, ही मोठी लक्षणीय गोष्ट आहे!
गरिबी, अनेकदा माणसाचे शिक्षण हिरावून घेते. इरफानच्या बाबतीतही तसेच झाले. त्याने नियमित शालेय शिक्षण घेतले नाही. न अडखळता वाचता-लिहिता येत नसल्याची कबुली तो स्वतः देतो. पण ज्ञानाची भूक मात्र त्याने मरू दिली नाही. हीच त्याच्या आयुष्याची सर्वात विलक्षण बाजू आहे. ज्ञानाकडे जाणारा त्याचा मार्ग पुस्तकांच्या पानांतून नव्हे, तर मोबाईलच्या स्पीकरमधून गेलाय. तो व्हॉईस सर्चवर आधारित ध्वनी सहाय्यकांचा वापर करून आपली जिज्ञासा शमवून घेतो! इतिहास, संविधान, साहित्य, स्वातंत्र्यलढा, भगतसिंग, गांधी, दुष्यंत कुमार, अदम गोंडवी, जे काही समजून घ्यायचे असेल, ते तो ऐकतो. एखादे उत्तर पटले नाही, तर पुन्हा विचारतो. पुन्हा खात्री करतो. माहितीची पडताळणी करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून त्याने विलक्षण ज्ञानप्राप्ती केलीय आणि जोडीने विवेकाची कास धरलीय!
जंतर मंतरवरची त्याची मुलाखत प्रचंड व्हायरल झालीय, देशातल्या अनेक नामवंत विवेकी ज्ञानी मंडळींनी त्याच्याविषयी लिहिलंय. तो ह्या आंदोलनाचा चेहरा होण्याइतका मोठा नव्हता, मात्र आजघडीला सर्वत्र त्याची चर्चा आहे. भावनांच्या आहारी न जाता, देशाच्या लोकशाहीवर आणि त्यातील सहभागावर, आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाद्वारे त्याने आपला हक्क ज्या पद्धतीने सांगितलाय ती थक्क करणारी आहे. त्याचे मुद्दे विलक्षण प्रभावी आहेत.
"सरकार, लॉजिस्टिक्स म्हणजेच मालवाहतूक व वितरण व्यवस्था आणि देशाचा जीडीपी वाढवण्याबद्दल बोलते; सरकार मोठ्या उद्योगांना कमी व्याजाची कर्जे आणि स्वस्त वीज पुरवते. पण सरकार मजुरांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला किंवा किमान वेतन देऊ शकत नसेल तर तुमच्या त्या जीडीपीचा काहीच उपयोग नाही," असे म्हणत त्याने देशातील गरीब मजुरांच्या समस्यांकडे लक्ष वेधलेय.
"एखादा मजूर पाचशे रुपये कमवून घरी आणतो; त्यातून मीठ, साबण, तांदूळ आणि पीठ खरेदी करतो आणि त्या खरेदीवरही तो टॅक्स भरतो. ते देखील भारताचे करदाते आहेत; ते कोणाच्या दयेवर जगत नाहीत;" गरीब मजुरांच्या वतीने बोलताना त्याचा श्वास कोंडला होता, अश्रू अनावर झाले होते.
तो म्हणतो की, "मी कुठेतरी ऐकलेय की, हा देश 'सुवर्णकाळातून' जात आहे, तरीही आजही बहुसंख्य भारतीय किमान उत्पन्नापेक्षा कमी पैशांवर गुजराण करतात आणि शारीरिक कष्ट करणारे मजूर म्हणून काम करतात." इरफानची हतबलता, समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत करते, मन हेलावून टाकते आणि आपल्याला अंतर्बाह्य हादरवते; आपल्याला त्याची व्यथा जाणवते, पण पुढच्याच क्षणी जाणवते की, इरफान म्हणतो तसे आपण सारेच हतबल झालो आहोत.
इरफान म्हणतो की, "मजुरांबद्दल कोणीच बोलत नाही; मजूर रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाहीत. जर त्यांनी एक दिवसही काम बुडवले, तर त्यांच्या घरी चूल पेटणार नाही; मजूर निषेध करू शकत नाहीत." हे सांगताना त्याला रडू कोसळलं. मजुरांवर अन्याय आणि क्रूरता करण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही हे तो बजावून सांगतो.
केवळ इंटरनेटचा वापर करणारा एखादा मजूर किंवा हातगाडीवाला आर्थिक संकटाचे इतके सखोल ज्ञान कसा बाळगू शकतो, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. ह्या प्रश्नाआडून आपण सत्य नाकारू शकत नाही. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतात मजुरांची अवस्था किती दयनीय आहे, हे इरफान अगदी स्पष्टपणे मांडतो!
आपल्या कक्षेबाहेरील आणि बौद्धिक पातळीवरील विषयांवरही त्याचे विचार अगदी स्पष्ट आहेत. अशी माणसं झोपडपट्ट्यांतून आणि संघर्षातून वर येतात, मनातील भावना मोकळेपणाने मांडतात; त्यांच्या शब्दांतून शहाणपण एखाद्या प्रवाही नदीसारखे वाहते, जे थेट आपल्या काळजाला भिडते आणि दीर्घकाळ आपल्या मनात साद घालते.
नव्या पिढीत अशी माणसे अस्तित्वात आहेत, ह्या गोष्टीचाही आता अभिमान वाटू लागलाय, कारण विवेकाची चूड पेटवण्याच्या काळात, एक अल्पशिक्षित तरुण हातगाडीवाला देशातल्या नामवंत अर्थशास्त्रज्ञांनाही लाजवेल असे लॉजिक मांडतो तेव्हा आपण दिग्मूढ होतो!
इरफानच्या बोलण्यात आकडेवारी आहे; पण आकड्यांपेक्षा त्यामागची माणसे जास्त टोकदार आहेत. तो अर्थव्यवस्थेवर भाष्य करतो, पण शेअर बाजाराच्या भाषेत नाही. त्याची अर्थव्यवस्था दिवसाची मजुरी, घरभाडे, औषधाचा खर्च आणि स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे त्याचे प्रश्न अर्थशास्त्राच्या ग्रंथातून आलेले नाहीत; ते रोजच्या जगण्यातून आलेले आहेत.
तो स्वतःला कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडत नाही. सत्तेत जाण्याची महत्त्वाकांक्षा नसल्याचे सांगतो. महात्मा गांधींच्या अहिंसेवर विश्वास असल्याचेही तो नमूद करतो. आंदोलनात सहभागी होणे, प्रश्न विचारणे आणि संविधानाचा उल्लेख करणे, याचा अर्थ एखाद्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणे असा नसतो, हे तो अधोरेखित करतो.
मोहम्मद इरफान सारखे तरुण गरीब असूनही या भूमीचा वारसा आणि देशाचे भविष्य आहेत, एका तेजस्वी आणि विशुद्ध विचारसरणीचे धनी आहेत. ह्या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारावा वाटतो की, अशांच्या दयनीय अवस्थेला कोण जबाबदार आहे? अशा लोकांची काळजी कोण घेणार? त्यांना न्याय कोण मिळवून देणार? आणि या गरीब मजुरांसाठी आवाज कोण उठवणार?
जंतर मंतरवर लाखो लोकांच्या गर्दीत, जिथे 'जेन झी'ला बदमाश ठरवले जात होते, तिथे इरफानने सरकारला आरसा दाखवलाय. आंदोलन सुरु असताना कदाचित त्याला कोणी नीट पाहिले नसेल, परिणामी मंचावर बोलण्याची परवानगी त्याला मिळाली नाही. तो मंचावर आला असता तर भगतसिंगांचा अंश नव्याने समोर आला असता! त्याने या देशातील तरुणांमध्ये आणखी थोडा उत्साह भरला असता. संवादाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, हे सरकारला सांगितले असते.
आपल्या देशाचे राजकारण हिंदू-मुस्लिम आणि जातीच्या आधारावर विभागलेले आहे, आणि या देशात असेच तरुण लोकशाही जिवंत ठेवत आहेत हे वास्तव त्याच्या रूपाने ठळकपणे समोर आलेय. मोहम्मद इरफानची खरी ताकद त्याच्या प्रश्नांत आहे. त्याच्या प्रश्नांची उत्तरे कुणापाशीच नाहीत! ती समाजाने, सरकारने आणि नागरिकांनी मिळून शोधायची आहेत. कदाचित म्हणूनच मोहम्मद इरफानची कथा एका व्यक्तीची राहत नाही; ती भारतीय लोकशाहीतील त्या असंख्य चेहऱ्यांची कथा बनलीय, जे रोज श्रम करतात, रोज जगण्यासाठी लढतात, आणि तरीही जगाकडे प्रश्न विचारण्याचे धैर्य सोडत नाहीत.
त्याच्या तळहातांवर श्रमाचे घट्टे आहेत; पण त्या हातांनी उचललेला सर्वांत मोठा भार कदाचित विटांचा किंवा हातगाडीचा नाही, तर स्वतःला आणि समाजाला सतत प्रश्न विचारण्याचा आहे. देशाच्या मेनस्ट्रीम मीडियात असा एकही अँकर नाही, जो अशा गोष्टी स्पष्टपणे बोलत नाही... एवढ्या हुशार व्यक्तीला औपचारिक शिक्षण का मिळालं नाही? त्याच्यासारख्या लाखो लोकांच्या स्वप्नांचा आक्रोश कोणी ऐकणार की नाही हा कळीचा प्रश्न आहे! हा अफलातून तरूण दिल्लीच्या झोपडपट्टीत राहतो. त्याला सलाम!
- समीर गायकवाड