Maharashtra News Live Update: आंदोलक विद्यार्थ्यांवर देशाला गर्व आहे - राहुल गांधी
Saam TV July 29, 2026 04:45 PM
एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरण 

एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक काल पासून नंदुरबारमध्ये तळ ठोकून आहेत.

आंदोलक विद्यार्थ्यांवर देशाला गर्व आहे - राहुल गांधी 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत परिक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा करत आहेत. त्यामध्ये राहुल गांधी आंदोलक विद्यार्थ्यांवर देशाला गर्व आहे असंही म्हणाले.

संत आणि देव भेटीची भक्ती सोहळा रंगला

आज गोपाळ काल्याने आषाढी यात्रेची सांगता झाली. दरम्यान आज सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत आणि देवभेटीचा सोहळा रंगला. आषाढीसाठी आलेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत सोपानकाका यासह इतर दहा मानाच्या पालख्यांनी मंदिरात येऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी सर्व संतांच्या पालख्याचे मंदीर समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. टाळ मृदंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने मंदिर व परिसर दुमदुमून गेला.

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात अन्न औषध प्रशासन विभागाची धाड

अन्न आणि औषध प्रशासनाने खांडबारा गावात बेकायदेशीर ताडी विक्रीवर धाड टाकून फूड लायसन्स नसलेली आणि संशयित ताडी नष्ट केली. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असले, तरी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.अनेक दिवसांपासून तक्रारी असतानाही स्थानिक यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष का केले परवान्याविना आणि निकृष्ट दर्जाची ताडी इतके दिवस उघडपणे कशी विकली जात होती असे सवाल नागरिक विचारत आहेत.

जालना-अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाच्या संवाद बैठकीला सुरुवात

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पार पडत आहे संवाद बैठक...

29 ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर बैठक..

बैठकीनंतर मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद,मनोज जरांगे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष

अकोल्यात भरधाव ट्रकचा धिंगाणा तर 8 ते 10 वाहनांसह महागड्या कारचे नुकसान

अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरात भरधाव ट्रकने मंगळवारी अक्षरशः धिंगाणा घातला....तर भरधाव ट्रकने आठ ते दहा दुचाक्यांसह रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका महागड्या कारला जोरदार धडक दिल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.... तर यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही... तर स्थानिकांनी चालक मद्यधुंद असल्याचा आरोप केला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

अमित शहांच्या दौऱ्यावरून भाजप-काँग्रेस आमने सामने

अमित भाई राजकीय कार्यक्रमाला येत नाहीत काँग्रेस याला राजकीय वळण देत आहे. काँग्रेस ने ज्या पद्धतीने आंदोलन करू असं म्हणलं आहे, भाजप काँग्रेसला आव्हान देते आहे की "इलाका तुम्हारा धमाका हमारा रहेगा", जिथे तुम्ही आंदोलन करणार आहेत तिथे आम्ही अमित भाई यांचे जंगी स्वागत करणार. गनिमी काव्याने जर त्यांनी काही केलं तर काँग्रेस नेत्यांना पुण्यात इथून पुढे उजळ माथ्याने फिरता येणार नाही, असा इशारा भाजप ने काँग्रेस ला दिला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यावरून आता काँग्रेस आणि भाजप आमने सामने आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोल्हापूरची पंचगंगा यंदा तिसऱ्यांदा पात्र बाहेर पडली आहे. जिल्ह्यातले 30 बंधारे पाण्याखाली गेली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवरून वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्याची तहान भागवणारे राधानगरी धरण सध्या 97 टक्के भरले आहे

पश्चिम साताऱ्यात मुसळधार पाऊस; कोयना 83 टीएमसीवर, धरणांतून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असून धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा आता 83 टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1 हजार 50 क्युसिक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

४० ते ४५ किलोमिटर वेगाने किनारपट्टी भागात वारे वाहण्याची शक्यता

गेल्या चोवीस तासात ३७ मिलिमिटर सरासरी पाऊस

दोन महिन्यात सरासरीच्या ५३ टक्के झाला पाऊस

पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना पत्र

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा अरविंद शिंदे यांचा आरोप

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचा वरदहस्त असलेल्या भूमीग्रीन कंपनीला रेट मारून पडले पात्र ठरवण्यासाठी अटींमध्ये करण्यात आला बदल

४०० कोटींचे काम असलेले ९६७ कोटींपर्यंत पोहोचले असून यामध्ये पुणेकरांची लूट सुरू आहे

निजामांनी आणि इंग्रजांनी केलेली लूट देखील किरकोळ वाटावी अशी लूट सध्या पुणे महापालिकेत सुरू असल्याचा आरोप

पंढरपुरात एनडीआरएफ पथक तैनात; भीमा नदीची पाणी पातळी वाढल्याने सर्व बंधारे गेले पाण्याखाली

उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर मध्ये भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे. पंढरपूर मध्ये अजूनही वारकरी आहेत ते नदीकाठी जाऊन स्नान करत असतात. त्यामुळे कोणताही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी एस कार्तिकीएन यांच्या आदेशानुसार एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी नदीकाठी जाऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

सांगली बाजार समितीचे त्रिभजन कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द, भाजपाला धक्का

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहे. राज्याच्या सहकार विभागाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करत कवठेमहांकाळ आणि जत कृषी उत्पन्न बाजार समिती नव्याने निर्माण करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाकडुन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये धाव घेण्यात आली होती. ज्यावर कोल्हापूर खंडपीठाने राज्य सरकारच्या त्रिभजनाच्या आदेश रद्द केला आहे.

कुडाळमध्ये विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

कुडाळ शहरातील गणेशनगर येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी पती सिद्धिविनायक कुडाळकर याला अटक केली आहे. पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर असून आज त्याला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी सकाळी सौ.तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर तीचे भाऊ भूषण सांगेलकर यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

मराठवाड्यात पाणीसाठ्याची चिंताजनक परिस्थिती

पावसाळा अर्धा संपतोय दमदार पाऊस नसल्यानं मराठवाड्यात पाणीसाठ्याची चिंताजनक परिस्थिती आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर, जालना शहरासह जायकवाडी धरणाच्या आजूबाजूला असलेल्या गावाच्या पाण्याचे टेंशन दूर झालंय. कारण नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यात पाण्याचा विसर्ग वेगात सुरू आहे. त्यामुळं आज सकाळी ९ वाजेपर्यंत जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा ६६.२० टक्क्यांपर्यंत पोहचला.

पंढरपुरात चंद्रभागा दुथडी; चंद्रभागेच्या पात्रात उतरण्यास भाविकांना मनाई

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून भीमा नदी पात्रात जवळपास 61 हजार इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी पंढरपुरात पोचल्याने चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे.

दरम्यान पोलीस प्रशासनाने भाविकांना नदीपात्रास जाण्यास मनाई करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व घाटांवर बॅरिकेडस लावण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे उजनी धरण 100 टक्के भरले आहे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून 61 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच वीर धरणातून ही जवळपास 5 क्युसेक विसर्ग निरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?

लातूरमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याच समोर येत आहे, मागच्या 20 दिवसात वेगवेगळ्या चार स्कूलबस अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत, तर चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ येथील वटसिद्धनाथ प्राथमिक आश्रम शाळेचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, शाळेतील स्कूलबस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसून विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक होताना पाहायला मिळाली,या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारामुळे अपघात झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसाअभावी टोमॅटो शेती धोक्यात, वडवळ शिवारातील शेतकरी अडचणीत, टोमॅटो शेतीला घागरीने पाणी घालण्याची वेळ

लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे, सुरुवातीला झालेल्या जेमतेम पावसावर उगवून निघालेले कवळी शेती पिक आता सुकू लागली आहेत, चाकूर तालुक्यातल्या वडवळ शिवारात टोमॅटो शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र दोन महिन्यापासून पाऊस होत नसल्याने, या भागातील शेतकऱ्यांना आता घागरीने पाणी देऊन टोमॅटो शेती जगवण्याचा प्रयत्न करावा लागतो आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून हजारो साईभक्त साई चरणी नतमस्तक

साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेल्या गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डी नगरी साई नामाच्या जयघोषाणे दुमदुमून गेली आहे.. साईबाबांना गुरूस्थानी मानून साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक साई नगरीत दाखल झाले आहेत.. साई मंदिराच्या दर्शन रांगा आणि शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.. साई मंदिर तसेच गुरूस्थान मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.. साई दर्शनानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय.. देशभरातून आलेले साईभक्त साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आहेत

भूम पोलीस निरीक्षकांची बदली करा, अन्यथा १४ ऑगस्टपासून भूम तालुका बंदचा नागरीकांचा इशारा

धाराशिवच्या भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत नागरिकांच्या वतीने पोलीस आयुक्त संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बदली करण्यात आली नाही, तर १४ ऑगस्टपासून भूम तालुका बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Maharashtra News Live Update: दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत पावसाची दमदार हजेरी; रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी

दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी सहा वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा ७ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा होती. मात्र पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबली होती. रोहिणी नक्षत्रातील अनेक कामे रखडली असून दुबार पेरणीची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत होते.

महाबळेश्वर-मेढा रस्त्यावरील केळघर घाट सर्व वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर-मेढा-सातारा रस्त्यावरील केळघर घाटात काळा कडा ठिकाणी वारंवार दरड कोसळून दगड आणि माती रस्त्यावर येत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून आज २८ जुलै पासून हा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेतला असून जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रवाशांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा असे पत्रक काढण्यात आले आहे..

पर्यायी मार्ग

१) मेढा - मालदेव मंदिर - मार्ली - भिलार - महाबळेश्वर

२) मेढा - कुसुंबी - सह्याद्रीनगर - माचुतर - महाबळेश्वर

नीट पेपरफुटी प्रकरणात आज दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी

सी बी आय ने दाखल केलेले दोषारोपपत्रात १३ आरोपींची नावे

सी बी आय च्या अर्थिक गुन्हे शाखेकडून दोषारोपपत्र न्यायालयासमोर ठेवले जाणार

यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल यांच्या नावांचा समावेश

शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, प्रल्हाद कुलकर्णी, तेजस शहा, डॉ. मनोज शिरुरे, शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे, मनीषा हवलदार यांच्या विरोधात सुद्धा दोषारोपपत्र सादर

अर्जुन आनंद यांची दिल्ली येथील राउज एवेन्यू कोर्ट मध्ये सुरू असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सी बी आय चे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

डिजिटल फॉरेन्सिक अहवाल, हस्ताक्षर तज्ञांची मतं आणि शैक्षणिक विभागातील तज्ज्ञांची मतं सी बी आय ने घेतले जाणून

ताम्हिणी घाट मार्ग गुरुवारपासून हलक्या व प्रवासी वाहनांसाठी सुरू होणार

अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेला ताम्हिणी घाटातील पुणे–कोलाड राष्ट्रीय महामार्ग (क्र. ७५३ एफ)

गुरुवारपासून हलक्या व प्रवासी वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिली.

पुण्यात होणार श्वान गणना! कुत्र्यांच्या मोजणीसाठी २५ लाख रुपयांची निविदा जारी

पुणे शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, त्यांची संख्या दीड लाखाच्या पुढे गेली आहे. केवळ काही हजारांत कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया होत असताना आता पुणे महापालिकेने श्वानांची गणना करण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची निविदा जाहीर केली आहे. मागील वर्षी कुत्रा चावण्याच्या सुमारे ३० हजार ६१३ घटना घडल्या असल्याची माहिती आहे मात्र असं असतानाच आता भटक्या कुत्र्यांची संख्या मोजण्यासाठी २५ लाख रुपयांचे टेंडर जारी करण्यात आले आहे. या टेंडर ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये महापालिका हद्दीतील भटक्या व मोकाट श्वानांची गणना करण्यासाठी खाजगी संस्थेची नियुक्ती करणे, ऍप्लिकेशन विकसित करणे व त्याची गणना करणे असं निविदा जारी केली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नारायणपूर परिसरात वाहतूक नियमन; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वाहतूक नियमनाचे आदेश जारी केले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: लॉटरी लागलीय म्हणत वृद्धेला गंडा; तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला लॉटरी लागली आहे असे सांगत एका ठगाने ६८ वर्षीय वृद्धेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. भगतसिंगनगर येथील कमल सुखदेव शिंदे या घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर दुचाकीवर बसवून राजधानी हॉटेल परिसरात नेले आणि 'लॉटरीचे पैसे मिळवण्यासाठी बांगड्या साहेबांना दाखवाव्या लागतील' असे सांगत हातातील तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेतल्या. बांगड्या हातात येताच ठगाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कमल शिंदे यांच्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री देणारा घोटाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री देणारा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्यापीठातीलच काही कर्मचारी बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्री करणारा रॅकेट चालवत असल्याची माहिती साम टीव्ही न्यूज च्या हाती लागली आहे.

Maharashtra News Live Update: - साईबाबांच्या शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह

साईबाबांच्या शिर्डीत आज गुरूपोर्णीमेचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे.. साईबाबांना गुरूस्वरूप मानणारे हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले असून साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे.. तीन दिवस चालणा-या उत्सवाचा आज दुसरा आणि मुख्य दिवस असून देश विदेशातून आलेल्या भाविकांना आज साईबाबांचे दर्शन मिळावे यासाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे..

कर्जमाफीची पहिल्या यादीत 50 हजार शेतकऱ्यांची नावे

कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात या योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकेच्या एक लाख ६१ हजार १४८ शेतकऱ्यांची नावे पाठविण्यात आली आहेत. त्यांपैकी ५१ हजार शेतकऱ्यांच्या नावाची जिल्हा बँकेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आणि ५० हजार शेतकऱ्यांच्या नावाची राष्ट्रीयीकृत बँकांची पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात एक लाख एक हजार ४७० शेतकरी कर्जमुक्तीला पात्र ठरले आहेत.यामुळे राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा बँकेच्या ३७ हजार १८८ शेतकऱ्यांनीच आतापर्यंत आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली. यादीत नाव जाहीर झालेल्या शेतकऱ्यांपैकी ६४ हजार २८२ शेतकरी या प्रक्रियेच्या दूर आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.