कंगना राणौत यांना जमिनीवर आणलं, गुणरत्न सदावर्ते प्रचंड भडकले, म्हणाले, राणौत यांनी…
Tv9 Marathi July 31, 2026 12:45 AM

Kangana Ranaut On BJP Delhi Protest : कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या दिल्लीतील आंदोलनाची देशातच नव्हे तर संपूर्ण जगात चर्चा झाली. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता हे आंदोलन संपले असून आंदोलनातील प्रमुख चेहरे आपापल्या घरी परतले आहेत. दुसरीकडे भाजपाचे काही नेते मात्र सीजेपीच्या आंदोलनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यात खासदार कंगना राणौत यांचा नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांनी या आंदोलनात सामील झालेल्या तरुणाईला थेट गटरछाप म्हणून हिणवलं. जेन झीवर सडकून टीका केल्यानंतर आता कंगना राणौत यांच्यावरही अनेकजण हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील कंगना राणौतवर सडकून टीका केली आहे.

कंगना राणौत यांच्यावर केली टीका

गुणरत्न सदावर्ते यांनी कंगना राणौत यांच्यावर खरपूस शब्दांत टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचेही नाव घेतले. कंगना राणौत यांनी जी काही वक्तव्ये केली आहेत, त्याबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. युवकांनी कंगना राणौत यांच्या सिनेमातील एकाही फोटोवर टीका केलेली नाही. मोदींनीही युवकांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत घेतलेले आहे. कंगना राणौत या मोहन भागवत यांच्यापेक्षा मोठ्या नाहीत, असा हल्लाबोल सदावर्ते यांनी केला. तसेच पुढे त्यांनी सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्यावरही टीका केली. अभिजीत दीपके जे काही बोलत आहेत, ते समजण्याच्या पलीकडे आहे. त्यांनी प्रसिद्धीसाठी काहीही करू नये, असा सल्लाही सदावर्ते यांनी दिला.

मनोज जरांगे यांच्यावरही टीका

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावरही सदावर्ते यांनी टीका केली. मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगला संवाद आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात लोकांना त्रास देऊ नये, असे शिंदे यांनी जरांगे यांना सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा सदावर्ते यांनी व्यक्त केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.