मैदान जुने, चेहरे नवे! मला आमदार व्हायचंय…
Marathi September 20, 2024 12:24 AM

विधानसभेचा राजकीय आखाडा तापायला सुरुवात झालीय. या आखाड्यात उतरण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. आता पुढचा आमदार मीच होणार असं काहीजण ठासून सांगतायेत. अशीच परिस्थिती माढा विधानसभा मतदारसंघातही आहे. माढ्याचं मैदान जरी जुनं असलं तरी यावेळी चेहरे मात्र नवीन आहेत.

माढा मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये दिवंगत काशिनाथ अवसरे, भाई एस एम पाटील, विठ्ठलराव शिंदे, कृष्णराव परबत, धनाजीराव साठे, विनायकराव पाटील यांचा समावेश आहे. माढा मतदारसंघात माढा, पंढरपूर आणि माळशिरस या तीन तालुक्यातील गावांचा समावेश आहे. यामध्ये पंढरपूरातील 42 गावांचा तर माळशिरसमधील 14 गावांचा समावेश आहे. तर माढ्यातील 78 गावांचा मतदारसंघात समावेश आहे. त्यामुळं ज्याला कोणाला आमदार व्हायचंय त्याचा या सर्व मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असणं गरजेच आहे.

30 वर्ष एकहाती सत्ता मिळवणाऱ्या बबनदादा शिंदेंची निवडणुकीतून माघार

सलग 30 वर्ष माढ्याचा एकहाती गड काबीज करणारे आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी मैदानातून माघार घेतलीय. त्यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आणि बबनदादा शुगर्सचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं यावेळच्या निवडणुकीत रंगत निर्माण झालीय. कारण रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये पंढरपूरचे अभिजीत पाटील, अकूलजचे शिवतेजसिंह मोहिते पाटील, माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे, आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे, शिवाजीराजे कांबळे, संजयबाबा कोकाटे, शिवाजीराव सावंत हे इच्छुक आहेत.

2019 च्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणं बदलली

2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणं हळूहळू बदलू लागली. त्याचप्रमाणं माढा विधानसभा मतदारसंघातही हळूहळू बदल घडू लागला. शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून बबनदादा शिंदे ओळखले जात होते. मात्र, अजित पवारांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेत भाजपशी घरोबा केला. यानंतर आमदार बबनदादा शिंदे यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि माढा तालुक्यातील जनतेचा रोष वाढत गेला. माढ्यात बदल हवा आमदार नवा असा प्रचार होऊ लागला. हाच डाव साधत बबनदादा शिंदे यांच्या विरोधकांनी फायदा घेत वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलीय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारंसघात महायुतीच्या विरोधात वातावरण तयार झालं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा महायुतीला मोठा फटका बसला होता. मराठा समाजानं महायुतीच्या विरोधात मतदान केल्याचं पाहायला मिळालं होतं. याचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील यांना झाला होता.

अभिजीत पाटलांचा ‘धपका पॅटर्न’

बबनदादा शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर ‘धपका पॅटर्न’ म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूरच्या अभिजीत पाटलांनी शरद पवार यांच्याशी जवळीक साधली. ऊसाला जिल्ह्यात विक्रमी दर देणारे अभिजीत पाटील कमी काळात प्रसिद्धीच्या झोतात आलेत. त्यांनी माढा मतदासंघात खेळ पैठणीचा, माढा केसरी कुस्ती स्पर्धा, दही हंडीचा कार्यक्रम या माध्यमातून वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलीय. सध्या माढा मतदारसंघातील गावोगावी त्यांचे दौरे सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत विठ्ठल कारखान्याच्या साखरेच्या गोडाऊनला कुलुप लागल्यानं अभिजीत पाटील कोंडीत सापडले होते. यावेली कोंडीत सापडलेला गडी आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुत्र हलवली. त्यानंतर अभिजीत पाटलांनी माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या व्यासपीठावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विठ्ठल कारखान्याची साखर मोकळी झाली. याचा निंबाळकरांना काही फायदा झाला नाही आणि दुसीरकडं अभिजीत पाटील यांनी मात्र, जनतेचा रोष ओढावून घेतला. शरद पवारांनी संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर टाकली त्या अभिजीत पाटलांनीच फडणवीस यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय जनतेला काही पटला नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनीच कारखाना वाचवण्यासाठी अभिजीत पाटलांना सत्ताधाऱ्यांच्या गोटात पाठवल्याची चर्चा आहे.

मैदान जुने, चेहरे नवे! मला आमदार व्हायचंय...

लोकसभा निवडणुकीनंतर पाखरांची घरट्याकडे धाव, पण पवारांच्या मनात नेमकं कोण?

जसा लोकसभेचा निकाल लागला तसं राज्यातील वातावरण बदलू लागलं. माढा विधानसभेत देखील वेगानं चक्र फिरु लागली. उडालेली पाखरं पुन्हा आपल्या घरट्याकडं (शरद पवार) धाव घेऊ लागली. लोकसभा निवडणुकीनंतर अभिजीत पाटील हे पुन्हा शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरु झाली. अशातच आमदार बबनदादा शिंदे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही तुमचेच असल्याचं बोललं जाऊ लागलं. आता शरद पवार यांच्याकडे अभिजीत पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे तिकीटासाठी फिल्डिंग लावत आहेत. मात्र, शरद पवारांच्या मनात नेमकं कोण? हे आत्ताच समजणार नाही. जेव्हा शरद पवार तिकीट फायनल करतील तेव्हाच सगळे पत्ते खुले होणार.

माढा मतदारसंघावर मोहिते पाटलांचा डोळा

2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला जसा जोर का झटका बसला, तसाच झटका माढा लोकसभा मतदारसंघात देखील बसलाय. भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते. पण भाजपनं तिकीट न दिल्यामुळं त्यांनी शरद पवारांची तुतारी हातात घेऊन माढ्याचा किल्ला जिंकून दिल्ली गाठली. त्यामुळं गेल्या काही दिवसात मोहिते पाटलांची कमी झालेली राजकीय ताकद पुन्हा वाढली. ज्या मतदारसंघात शिंदे बंधू (आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे) यांची ताकद होती, त्या मतदारसंघात मोहिते पाटलांनी मताधिक्क्य मिळवलं. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. माढा मतदारसंघावर मोहिते पाटलांचा देखील डोळा आहे. तुतारीकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यांनी मतदारसंघात दौरे, संवाद, बैठका सुरु केल्या आहेत. पण त्यांच्या आडून सध्या भाजपकडून विधानपरिषदेवर आमदार असणारे रणजितसिंह मोहिते पाटील हे तर खेळी करतायेत का? ते माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. पण लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना माढा मतदारसंघातून निवडूण दिल्यामुळं पुन्हा माढा विधानसभेसा मोहिते पाटलांना मतदार स्वीकारतील का? हा देखील चिंतनाचा विषय आहे. माढा मतदारसंघात तिकीट कोणालाही मिळो, मात्र, विजयसिंह मोहिते पाटलांचं मत विचारात घेतल्याशिवाय शरद पवार हे तिकीट देणार नाहीत हे देखील तितकच खर आहे.

मैदान जुने, चेहरे नवे! मला आमदार व्हायचंय...

अॅड. मिनल साठे निवडणूक लढवणार, पण तिकीट मिळणार का?

माढा विधानसभा मतदारसंघाच तिकीट काँग्रेसकडून आपल्याला मिळावं, यासाठी माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मिनल साठे या देखील प्रयत्नशील आहेत. माढ्याचे माजी आमदार आणि कुर्मदुसा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. धनाजीराव साठे यांच्या त्या सुन आहेत. मागील काही दिवसापूर्वी मिनल साठे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (शरद पवार गट)  यांची भेट घेतली होती. त्यामुळं त्या देखील तुतारीकडून इच्छुक आहेत. त्यांनी माढा मतदारसंघात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती सुरु केलवी आहे. माढा तालुक्याच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. पण त्यांना तिकीट मिळणार का? प्रश्न उपस्थित होतेय.

मैदान जुने, चेहरे नवे! मला आमदार व्हायचंय...

माढा तालुक्यात काँग्रेसचा गट जीवंत ठेवण्यात साठे कुटुंबियांचं मोठं योगदान आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सच्चे मित्र म्हणून धनाजीराव साठे यांची ओळख होती. मात्र सुरुवातीला माजी आमदार विनायक बापू पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याच्यानंतर 1995 ला बबनदादा शिंदे अपक्ष आमदार झाले. त्यानंतर काँग्रेसची मतदारसंघातील ताकद कमी होत गेली आणि आमदार शिंदेचं वर्चस्व वाढत गेलं. आता यावेळी इच्छुकांच्या गर्दीत महिला उमेदवार म्हणून मिनल साठे यांना महायुती तिकीट देणार का? याची चर्चा सुरु आहे.

आमदार शिंदेंच्या कुटुंबात राजकीय संघर्ष, धनराज शिंदेंनी फडकावलं बडाचं निशाण

राज्यातील गटा तटाच्या राजकारणाची झळ गावात आणि घरातसुद्धा येऊन पोहोचलीय. सलग 30 वर्ष आमदार असणाऱ्या आमदार बबनदादा शिंदे यांच्या पुतण्यानं बंडाचं निशाण फडकवलंय. रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं धनराज शिंदे (Dhanraj Shinde) यांनी जाहीर केलंय. माढा वेलफेअर फाऊंडेशन आणि विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्यांचं काम सुरु आहे. ते तालुका पंचायत समितीटे सदस्य देखील झाले होते. धनराज शिंदे हे सध्या माढा मतदारसंघातील गावागावात जाऊन युवकांशी संवाद साधतायेत. आपल्याला सहकार्य करण्याचं आवाहन करतायेत. धनराज शिंदे यांचे वडील रमेश शिंदे यांनी सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर धनराज शिंदे यांच्यासह रमेश शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांमुळं शरद पवार या नवख्या चेहऱ्याला माढ्यातून संधी देणार का? अशीही चर्चा सुरुय. मात्र, धनराज शिंदे यांच्या भूमिकेमुळं शिंदे कुटुंबात राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे.

मैदान जुने, चेहरे नवे! मला आमदार व्हायचंय...

शरद पवार कोणता मोहरा हेरणार?

माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी हे सर्वजण शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. शरद पवार यांच्याकडून तिकीट नाही मिळालं तर अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी अनेकांनी केलीय. सध्या महायुतीकडून (भाजप, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट) यांच्याकडून वरील नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. त्यामुळं महायुती कोणाला तिकीट देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार हे अभिजीत पाटील, रणजितसिंह शिंदे, शिवतेजसिंह मोहिते पाटील, धनराज शिंदे, मिनल साठे की दुसराच कोणी? नेमका कोणाचा चेहरा हेरणार? हा सर्वात महत्वाचा विषय आहे.

मैदान जुने, चेहरे नवे! मला आमदार व्हायचंय...

खरचं आमदार शिंदेंच्या विरोधकांची मन जुळतील का? एकास एक टक्कर होणार का?

माढा मतदारसंघात आमदार बबनदादा शिंदे यांना पराभूत करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण 1995 पासून ते कायम विजयी झाले. एकास एक टक्कर कधी झालीच नाही. याचा फायदा आमदार शिंदेंना झाला. मात्र, यावेळी बबनदादा शिंदे यांचे विरोधक शिवाजीराजे कांबळे, दादासाहेब साठे, संजयबाबा कोकाटे, नितीन कापसे, संजय पाटील घाटणेकर यांनी टेंभूर्णीच्या महादेव मंदिरात जाऊन शेपथ घेतलीय. ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी सर्वांनी उभं राहण्याचा निश्चय केला आहे. बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात एकच उमेदवार उतरवण्याची तयारी केलीय. मात्र, हा संकल्प पूर्ण होईल तेव्हाच खरं कारण, सर्वांची मनं खरच जुळतील का?

रणजितसिंह शिंदे विरुद्ध अभिजीत पाटील अशी लढत होणार?

बबनदादा शिंदे यांनी मतदारसंघात मतांचं जाळ निर्माण केलं आहे. कारण मतदारसंघात त्यांचे तीन-चार साखर कारखाने आहेत. तसेच बँका आहेत. त्याचबरोबर दूध संघ ताब्यात आहे. पंचायत समिती ताब्यात आहे. खरेदी विक्री संघ त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळं या संस्थांमध्ये त्यांनी अनेक कामगार कामाला लावलेत. हा मतांचा मोठा गठ्ठा त्यांच्या बाजून आहे. पण यावेळी मराठा आरक्षणचा मुद्दा आणि शरद पवारांची साथ सोडल्याचा राग जनतेच्या मनात आहे. पण आमदार शिंदेंनी जर पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केला आणि पुत्राला तुतारीचं चिन्ह मिळालं तर त्यांचा मार्ग सुकर होण्याची चिन्हं आहेत. मात्र, मोहिते पाटलांना हे चालणार का? हा देखील महत्वाचा विषय आहे. दुसऱ्या बाजूला अभिजीत पाटील हे देखील साखर कारखानदारीतील मोठं नाव आहे. त्यांनी देखील आमदार शिंदे यांच्यापुढंआव्हान निर्माण केलं आहे. आमदार शिंदे यांच्यापेक्षा अधिकचा दर त्यांनी ऊसाला दिलाय. विशेष म्हणजे पंढरपुरातील 42 गावं माढा विधानसभा मतदारसंघात असल्यामुळं पाटलांनी चांगलाच जोर लावलाय. खरी लढत ही रणजितसिंह शिंदे विरुद्ध अभिजीत पाटील होण्याची दाट शक्यता आहे.

उजणीचं पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आलं…पण अद्यापही रस्ते, आरोग्य शिक्षणाचे प्रश्न कायम

माढा तालुक्यात उजनी धरणं झालं आणि भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आलं. तेव्हापासून दुष्काळी माढ्याचा भाग ऊसाच्या शेतीनं हिरवागार झालाय. कोरडवाहू शेतकरी बागायती शेतकरी झाला.  उजनीच्या पाण्यामुळं मोठ्या प्रमाणात ऊस शेती, फळबागा फुलल्या. शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे येऊ लागले. मतदारसंघात एक नव्हे दोन नव्हे तर पाच सहा साखर कारखाने उभे राहिले. असं असलं तरी मतदारसंघातील सारे प्रश्न सुटलेत असं नाही. अद्यापही मतदारसंघात रस्त्याचे, आरोग्याचे, शिक्षणाच्या सुविधेचे प्रश्न कायम आहेत. आणखी माढ्याचा काही भाग दुष्काळानं होरपळतोय. नवीन येणाऱ्या लोकप्रतिनीधीनं या प्रमुख प्रश्नाकडं लक्ष देणं गरजेचं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.