संजय राऊत भ्रमिष्ठ होऊन वेड्यासारखं काहीही बडबड करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे म्हणत भातखळकरांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला १०० जागादेखील मिळणार नाहीत, असा मोठा दावा अतुल भातखळकरांनी केलाय. दरम्यान, जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ‘मातोश्री’ निवासस्थानी जात मलिक यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. यावर अतुल भातखळकर यांनी भाष्य केले आहे. ‘एकादशी गेली निर्जळीकडे अशी अवस्था आहे. दोघांनाही कोणतंही राजकीय अस्तित्व नाही. दोघांमध्ये ताकद नाही’, असे म्हणत त्यांनी खोचक टीका केली तर उद्धव ठाकरेंना आता देशभरातील मोदींविरोधातील लोकांना भेटणं एकच काम राहिलं आहे. कारण जनतेत आता त्यांना कोणतंही स्थान नाही, असे म्हणत भातखळकरांनी हल्लाबोल केला.