टीम इंडियाचा बांगलादेशला व्हाईटवॉश, दुसऱ्या कसोटीत 7 विकेटने नमवलं
GH News October 01, 2024 05:18 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. भारताने अपेक्षेप्रमाणे बांगलादेशला दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारली. यासह मालिका 2-0 ने खिशात घातली, तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. खरं तर दुसरा कसोटी सामना ड्रॉ होईल अशीच स्थिती होती. कारण पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचा खेळ झाला. बांगलादेशच्या 3 गडी बाद 107 धावा होत्या. त्यानंतर दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी काय होणार अशी स्थिती होती. पण भारताने चौथ्या दिवशी कमाल केली. खासकरून भारतीय गोलंदाजांनी कमबॅक करून दिली. बांगलादेशचा संपूर्ण संघ 233 धावांवर बाद केला. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशीच धडाकेबाज फलंदाजी केली. जो येईल तो बांगलादेशी गोलंदाजांना ठोकून काढत होता. चौथ्या दिवशी 9 गडी बाद 285 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताकडे 52 धावांची आघाडी होती. ही आघाडी मोडून काढताना बांगलादेशने तीन गडी गमवले होते. त्यानंतर शदमान इस्लामने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतक झाल्यानंतर आकाश दीपने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तसेच जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

बांगलादेशने दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 146 धावा केल्या आणि विजयासाठी 94 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 3 गडी गमवून पूर्ण केलं. रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करून देण्यासाठी प्रयत्न केला. त्याने एका चौकाराच्या मदतीने 7 चेंडूत 8 धावा केल्या. पण मेहिदी हसनच्या गोलंदाजीवर हसन महमूदने त्याचा झेल घेतला आणि बाद केलं. शुबमन गिल 10 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला.

बांगलादेशविरुद्धचे दोन्ही सामने सहज जिंकल्याने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेसाठी फायदा झाला आहे.बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्याने भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी झाली आहे. भारतीय संघाला आता आणखी 8 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी तीन कसोटी सामने न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळायचे आहेत. तर पाच कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.