मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राला ‘एटीएम’ बनवून लुटले असून या लुटीची माहिती जनतेपर्यंत पोचविण्याचे काम काँग्रेसचा ‘प्रचार रथ’ करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने प्रचार रथ बनवला असून त्यातून युती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पटोले यांच्या हस्ते व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या चित्ररथाचे (प्रचार रथ) उद्घाटन मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पटोले म्हणाले, ‘महायुती सरकारने राज्याला लुटले असून महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक गुजरातला पळविली व राज्यातील गुतंवणूक व लाखो तरुणांचे रोजगार त्यामुळे हिरावले गेले आहेत. मोदी-शहा यांच्या आदेशाचे पालन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवला. ही माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी अनेक प्रचार रथ राज्यभर जाऊन जनतेला माहिती देतील.’