: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. बेंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये असा विक्रम रचणारा भारत पहिला संघ बनला आहे. सध्या भारताच्या जवळपास इतर कोणताही संघ पोहोचू शकलेला नाही. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया सध्या पिछाडीवर आहे, मात्र संघ विक्रम करण्यात मागे नाही. दिवसेंदिवस भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये मोठे मोठे विक्रम करत आहे. आता भारताच्या या नव्हा विक्रमाबद्दल माहिती जाणून घेऊयात.
टीम इंडियाच्या नावावर ऐतिहासिक विक्रम
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 3 विकेट गमावून 231 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या डावात 70 धावा केल्या. मात्र, दिवस संपण्यापूर्वीच तो बाद झाला. या खेळीत एक षटकार मारला. त्याच्या या षटकारासह भारताने इतिहास रचला. या वर्षातील कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हा 100 वा षटकार होता. याआधी कसोटी क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही संघाने 100 षटकार मारलेले नाहीत. त्यामुळे अशी कामगिरी करणारा बनला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे संघ
- भारत - 102 षटकार (2024)
- इंग्लंड – 89 षटकार (2022)
- भारत - 87 षटकार (2021)
- न्यूझीलंड - 81 षटकार (2014)
- न्यूझीलंड - 71 षटकार (2013)
तिसऱ्या दिवशी कसोटी सामन्यात काय झाले?
बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खराब कामगिरीनंतर टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी पलटवार करण्यात यश मिळवले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 3 गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 46 रन्सवर ऑलआऊट झाली होती. यानंतर न्यूझीलंडने 402 धावा केल्या. अशा स्थितीत टीम इंडिया अजूनही 125 धावांनी पिछाडीवर आहे. सर्फराज खान सध्या भारताकडून फलंदाजी करत आहे. तो 70 धावा करुन नाबाद आहे. त्याच्याकडून भारताला शतकाची अपेक्षा असणार आहे.