“काँग्रेस आणि आमच्यामध्ये जागा वाटपाची चर्चा थांबलेली असं म्हणता येणार नाही. काल दिवसभर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चर्चा सुरु होती. जयंत पाटील आणि आम्ही चर्चेला बसलो होतो. राष्ट्रवादी आणि आमच्यातील बरेचसे पेच सुटलेले आहेत. शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता लागते, ती आमच्या दोघांमध्ये आहे” असं खासदार संजय राऊत नियमित पत्रकार परिषदेत म्हणाले. “अनेक जागांवरचा तिढा आम्ही सोडवलेला आहे. अर्थात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन असतं. राष्ट्रवादी आणि आमच्या बऱ्याच गोष्टी मोकळ्या झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज 11.30 वाजता मातोश्रीवर येतील. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करतील” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
नाना पटोले जागा वाटपात अडवणुकीची भूमिका घेतायत अशी चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “मी असं म्हटलेलं नाही. माझ्या तोंडी तुम्ही हे वाक्य घालू नका. मी कोणावरही व्यक्तीगत मतप्रदर्शन केलेलं नाही. तेवढी सभ्यता, संस्कृतपणा आमच्यात आहे” “आघाड्या निर्माण होतात, तेव्हा जागावाटपात असे अडथळे येतात. शिवसेना-भाजपा एकत्र होते, तेव्हा असे अडथळे यायचे” असं संजय राऊत म्हणाले.
आज 12.30 वाजता काय समजणार?
“काँग्रेस मोठा राजकीय पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षाने स्थान दिलं पाहिजे. केरळ, कर्नाटक तसच अन्य राज्यात प्रादेशिक पक्षांच्या जोरावर राजकारण सुरु आहे. प्रादेशिक पक्ष नसते, तर मोदी आज पंतप्रधान होऊ शकले नसते. इंडिया आघाडीत सर्वात जास्त प्रादेशिक पक्ष आहेत” असं संजय राऊत म्हणाले. सोमवार-मंगळवार पर्यंत जागावाटप जाहीर होईल का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “राष्ट्रवादी आणि आमच्यात जागा वाटप संपलेलं आहे. आमच्यात फार मतभेद नाहीत. आमच हायकमांड मुंबईत आहे. काँग्रेस-शिवसेनेत काय फायनल होतं, ते आज 12.30 वाजेपर्यंत समजेल”